चंद्रपूर : खरीप हंगामात जिल्ह्यात चोर बिटीच्या माध्यमातून ग्रामीण भागात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरू आहे. दुसरीकडे, बी-बियाणांसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लगतच्या तेलंगणा राज्यातील बेला या गावात गर्दी केल्याचे दिसून येत आहे. यामुळे जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रे ओस पडली आहेत. महाराष्ट्राच्या तुलनेत तेलंगणा येथे उच्चप्रतीचे व स्वस्त बी-बियाणे मिळत असल्याने मागील दोन वर्षांपासून सीमावर्ती तालुक्यातील शेतकऱ्यांनी तेलंगणा राज्यातील बेला या गावाकडे आपला मोर्चा वळवला होता. मात्र, एका कृषी केंद्र संचालकाने दिलेल्या माहितीनुसार, आता भद्रावती, वरोरा, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, मूल, सावली, नागभीड व सिंदेवाही या भागांतील शेतकरीदेखील मोठ्या संख्येने तेलंगणा राज्यातील बेला येथून बी-बियाण्यांची खरेदी करीत आहेत.
दुसरीकडे, बियाण्यांचा काळाबाजारही सुरू आहे. ग्रामीण भागात सक्रिय एजंट कृषी केंद्रांच्या माध्यमातून चोर बीटी शेतकऱ्यांच्या माथी मारत आहेत. राजुरा तालुक्यात पोलीस व कृषी विभागाने संयुक्त कारवाई करीत दीड लाखांपेक्षा अधिक किंमत असलेला अनधिकृत बियाणे साठा जप्त केला. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत कापूस बियाणे दाखल झाले आहे. एजंट शेतकऱ्यांना आमिष दाखवून त्यांची फसवणूक करीत आहे. या फसवणुकीला बळी पडू नका, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
साडेचार लाख हेक्टर खरिपाचे क्षेत्र
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण पाच लाख ५२ हजार ७२९ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. यात सर्वसाधारण खरीप क्षेत्र चार लाख ५८ हजार ७२९ हेक्टर, तर सर्वसाधारण रब्बी क्षेत्र ८८,२४५ हेक्टर आहे. जिल्ह्यात भात, सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी ही महत्त्वाची पिके घेतली जात असून २०२५-२६ वर्षाकरिता चार लाख ७५ हजार हेक्टरवर खरीप लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात ६४५८३ क्विंटल बियाणांची मागणी नोंदवण्यात आली आहे. तसेच एक लाख ६७ हजार १७८ मेट्रिक टन रासायनिक खतांचे वावंटन प्राप्त झाले आहे. यावर्षी १२५० कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे नियोजन असल्याचे सांगितले जाते.