चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावात पोहण्यासाठी गेलेल्या जनक गावंडे, यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे व तेजस ठाकरे या पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली.

चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारी येथील रहिवासी असलेली ही सर्व मुले धुलीवंदनानंतर शनिवारची सुटी घालवण्यासाठी नागभीड तालुक्यातील घोडाझरी येथे आली होती. सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घोडाझरी तलावातून तळोधी बाळापूर पाणी पुरवठा योजनेची टाकी असलेल्या परिसरात ही सर्व मुले पोहत होती. अशातच ही दुर्देवी दुर्घटना घडली. यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती भाजप पदाधिकारी तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. मृतांमध्ये चिमूर तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष विजय गावंडे यांचे बंधू माधव गावंडे यांची दोन मुले असल्याची माहितीही त्यांनी दिली. पाचही मृत साधारणत: २० ते २५ वयोगटातील आहेत. एकूण सहा जण पोहण्यासाठी उतरले होते. त्यातील एक जण बचावला.

या घटनेसंदर्भात तहसीलदार व ठाणेदार यांनाही माहिती देण्यात आली. त्यांनी घटनस्थळाकडे धाव घेतली. बचाव पथकाला देखील पाचारण करण्यात आले. घटनास्थळी नायब तहसीलदार उमेश कावळे, ठाणेदार कोकोटे, माजी जि.प.सदस्य संजय गजपुरे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोद चौधरी, नागभीड नगरपरिषदेचे माजी सभापती सचिन आकुलवार, यांच्यासह शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. आमदार बंटी भांगडिया यांनी प्रशासनाशी संपर्क साधून याबाबत माहिती घेतली व रुग्णवाहिकेची व्यवस्था करून दिली. मृतदेहांचे शवविच्छेदन झाल्यानंतर कुटुंबीयांना सोपवले जाणार आहे.

मृतांपैकी किशोर गावंडे यांचा एक मुलगा जनक सनफ्लॅग कंपनी, वरठी, भंडारा येथे नोकरीवर होता, तर लहान भाऊ यश नागपूरला इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाला शिक्षण घेत होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.