नागपूर : विकास कामांसाठी होणारी वृक्षतोड पर्यावरणासाठी जेवढी घातक ठरत आहे, तेवढेच नैसर्गिक आणि मानवनिर्मित वणवेदेखील पर्यावरणासाठी हानिकारक ठरत आहेत. गेल्या पाच वर्षांत गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक वणवे लागल्याचे स्पष्ट झाले आहे. वणव्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्याची होरपळ होत आहे.   

महाराष्ट्रात कोरडी पानझडी जंगले आहेत. राज्यात जानेवारीपासून पानगळ सुरू होते. वणव्याचा काळ सुरू होत असतानाच जंगलात मोठय़ा प्रमाणात बायोमास जमा झालेला असतो. एकीकडे वणव्यांचा काळ तर दुसरीकडे मोहफुले वेचण्याचा आणि तेंदूपाने संकलनाचा हंगामही सुरू होतो. त्यामुळे या काळात मोठय़ा प्रमाणात वणव्याच्या घटना घडतात. मानवनिर्मित वणव्याचे प्रमाण जवळजवळ ९९ टक्के असल्यामुळे वनखात्यासमोर हे एक आव्हानच आहे.

हेही वाचा >>>एसटी स्थानक स्वच्छ मोहिमेपासून स्थानिक स्वराज्य संस्था लांबच!

पायाभूत सुविधा, उद्योग, खाणी, सिंचन प्रकल्पांमुळे देशभरात मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड होत आहे. त्यात आता जंगलांमध्ये लागणाऱ्या आगींची म्हणजेच वणव्यांची भर पडली आहे. वणव्यांत मोठय़ा प्रमाणात वनक्षेत्राचा ऱ्हास होत आहे. राज्यातील सर्वाधिक वनाच्छादित भाग असलेल्या गडचिरोली पाठोपाठ अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हे वनक्षेत्र क्षती होण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

वनक्षेत्राची मोठी हानी

गेल्या पाच वर्षांत वन्यजीव क्षेत्रात लागलेल्या वणव्यांचे प्रमाणही मोठे आहे. मेळघाट वन्यजीव क्षेत्रात वणव्याच्या घटना कमी नोंदवण्यात आल्या असल्या तरीही वनक्षेत्र मोठय़ा प्रमाणात नष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, मुंबई वन्यजीव तसेच नागपूर वन्यजीव क्षेत्रातही सारखीच स्थिती आहे. तर काही ठिकाणी घटना कमी पण वनक्षेत्र अधिक जळाले आहे.

वनवृत्त              वणवे        वनक्षेत्राचा नाश (हेक्टर)

गडचिरोली         १०,२०३           ३१,२०६

मेळघाट              १,३३७            १६,१०६

ठाणे                  ४,६४०           १०,७८४

धुळे                  २,३३२              ९,१०७

अमरावती          १,३०२              ८,५६६

कोल्हापूर           २,२४२             ८,११७

नाशिक          २,५५५           ७,९३६

नागपूर            २,७९४           ७,६६६

पुणे                १,५५८          ६,५६१

नागपूर (वन्यजीव) ७०४           ६,०५८

मुंबई (वन्यजीव)  १७५७          ५,९७७

औरंगाबाद          ३,१६२          ५,०२६

यवतमाळ           १,०१८        २,८४७

कांदळवन           ४            १,९०९