यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील पाणीटंचाईवर तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश देऊन पालकमंत्री संजय राठोड यांनी अरुणावती धरणाच्या दोन्ही कालव्यातून पाणी सोडण्याचे आदेश प्रशासनास दिले. त्यानुसार मंगळवार, ६ मे रोजी अरुणावती धरणाच्या डाव्या आणि उजव्या, अशा दोन्ही कालव्यांमधून पाणी सोडण्यात आल्याने शेतकरी, नागरिकांना दिलासा मिळाला असून, जनावरांनाही पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. या निर्णयाचा लाभ दिग्रससह आर्णी व घाटंजी तालुक्यातही होणार आहे.

शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख डॉ. विष्णू उकंडे यांनी या भागातील पिके वाळत चालल्याने, जनावरांना पाणी उपलब्ध नसल्याने तसेच विहिरींची पातळी खालावल्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीचा तपशील देत पालकमंत्री राठोड यांच्याकडे निवेदनाद्वारे कालव्यात पाणी सोडण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत पालकमंत्र्यांनी प्रशासनाला तत्काळ पाणी सोडण्याचे आदेश दिले.

यानंतर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंचन मंडळ यवतमाळचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि इतर अधिकाऱ्यांची सात सदस्यीय समिती तयार करण्यात आली. समितीने या भागातील पाणीटंचाईचा आढावा घेतला. त्यानंतर बैठक घेऊन कालव्यात पाणी सोडण्याची शिफारस केली. त्यानुसार ६ मे रोजी दोन्ही कालव्यांतून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळणार आहे, तसेच जनावरांसाठीही पाण्याची उपलब्धता होणार आहे. कालव्यात पाणी सोडल्याने विहिरींची पाणीपातळी वाढण्यासही मदत होणार आहे.

या निर्णयाबद्दल दिग्रस, आर्णी, घाटंजी तालुक्यातील जनतेने समाधान व्यक्त केले. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दिग्रस शहराला नांदगव्हाण धरणातून पाणी

दिग्रस शहरातील पाणटंचाईवर मात करण्यासाठी पालकमंत्री राठोड यांनी तत्काळ नियोजन करण्याच्या सूचना नगर परिषदेस दिल्या. दिग्रस शहरालगत नांदगव्हाण व अरूणावती धरण आहे. तरीही शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहरात आठवड्यातून एक दिवस नळ येतात. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यावर तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनास केल्या. त्यानुसार शहरातील बंद पडलेल्या बोअरवेल दुरूस्त करून वापरात आणल्या आहेत. तसेच धावंडा नदीतील विहिरींवरून पाणी पुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात आले. येत्या सात दिवसांत दिग्रस शहरास नांदगव्हाण धरणावरून पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे नगर परिषदेने सांगितले आहे.