देवेश गोंडाणे नागपूर : राज्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मोठय़ा प्रमाणावर प्राध्यापकांच्या रिक्त जागा असल्याने अतिथी प्राध्यापकांच्या खांद्यावर अतिरिक्त कामाचा भार आहे. मात्र, येथील अतिथी प्राध्यापकांना दोन वर्षांपासून मानधन मिळाले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मानधनाअभावी आता जगणे कठीण होत असल्याने काही प्राध्यापकांनी परिवारासह इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशा मागणीचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. दर्जेदार तंत्रशिक्षण देण्यासाठी राज्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये उभारण्यात आली. मात्र, प्राध्यापक भरती न झाल्याने अतिथी प्राध्यापकांच्या भरवशावर ही महाविद्यालये सुरू आहेत. उच्च शिक्षण घेतलेले हे प्राध्यापक नोकरी मिळत नसल्याने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात अतिथी प्राध्यापक म्हणून अपुऱ्या मानधनावर सेवा देतात. वर्षांकाठी त्यांना ७० ते ८० हजार रुपये मानधन मिळते. मात्र, दोन वर्षांपासून हे मानधनच मिळाले नाही. महाविद्यालय प्रशासन आणि शासनाकडे अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र, निधीअभावी मानधन देऊ शकत नाही, असे लेखी उत्तर पाठवण्यात आले. किमान प्राचार्याकडे असणाऱ्या निधीमधून प्राध्यापकांना वेतन द्यावे, अशी शिफारस करण्यात आली आहे. परंतु, प्राचार्याकडेही पुरेसा निधी नसल्याने ते अतिथी प्राध्यापकांचे वेतन देऊ शकत नाही. नागपूर येथील शासकीय महाविद्यालयातील एक असाच गंभीर प्रकार समोर आला असून शासनाच्या पत्रानुसार एका प्राध्यापकाचे ९० हजार तर, दुसऱ्या प्राध्यापकाचे ४३ हजारांचे मानधन महाविद्यालयाकडे थकीत आहे. त्यामुळे या सर्व प्रकारामुळे प्राध्यापक त्रस्त झाले असून वेतन देत नसाल तर परिवारासह इच्छामरणाची परवानगी द्या, असे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. नवीन भरती नाही.. शासनाकडून प्राध्यापक भरतीही केली जात नाही तर, दुसरीकडे अतिथी प्राध्यापकांचे वेतनही अडवले जात असल्याने शासनाच्या धोरणाचा निषेध केला जात आहे. यांसदर्भात विचारणा करण्यासाठी तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.