अकोला : विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुतीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्ती करण्यासह खामगाव जिल्हा निर्मिती करण्याची मागणी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी महायुती सरकारकडे केली आहे. या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा, धरणे आंदोलनासह रक्ताच्या स्वाक्षरीचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले.
उपविभागीय अधिकारी कार्यालयावर माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस डॉ. तब्बसुम हुसैन, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष हाजी रशीद खॉ जमादार, खामगाव तालुकाध्यक्ष मनोज वानखडे, शहराध्यक्ष सरस्वती खासने, शेगाव तालुकाध्यक्ष विजय काटोले, खामगाव कृ.उ.बा.स.चे माजी मुख्य प्रशासक पंजाबराव देशमुख, डॉ.सदानंद धनोकार, बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य यार्डमधून शेतकऱ्यांसह मोर्चा काढण्यात आला.
मोर्चेकऱ्यांनी खामगाव जिल्हा झालाच पाहिजे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. दिलीपकुमार सानंदा यांनी स्वतःच्या रक्ताने स्वाक्षरी केली, तर हजारो आंदोलकांच्या स्वाक्षरीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे, अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याकडे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत सादर केले.
अस्मानी आणि सुल्तानी संकटामुळे राज्यात जगाचा पोशिंदा हा अडचणीत सापडला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचार काळात महायुतीची सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल, असे आश्वासन वारंवार दिल्या गेले. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर १०० दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर देखील शेतकरी कर्जमाफी बाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार सानंदा यांनी केली.
बुलढाणा जिल्हा हा भौगोलिक दृष्ट्या खूप मोठा विस्तारलेला आहे. घाटाखालील तालुक्यांच्या सोयीसाठी बुलढाणा जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र खामगाव जिल्ह्यासह लाखनवाडा तालुक्याची निर्मिती करण्याची अनेक वर्षापासूनची जिव्हाळ्याची मागणी आहे. केंद्रात व राज्यात भाजपच्या नेतृत्वात सत्ता असल्याने महायुती सरकारकडून दोन्ही मागण्या पूर्ण होतील, अशी जनतेला आशा आहे. महायुती सरकारने जनतेचा अधिक अंत न पाहता खामगाव जिल्ह्याची घोषणा करून निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी सुद्धा द्यावी, असे सानंदा म्हणाले. मोर्चा व धरणे आंदोलनात मोठी गर्दी उसळली होती.