अकोला : काँग्रेसचे साजिद खान पठाण यांनी मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलवी यांना धमकी देण्यासह ॲड. प्रकाश आंबेडकरांविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप करून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने बुधवारी विविध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात गुन्हे दाखल करून अटक करण्याच्या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना वंचितने निवेदन दिले.

मुस्लिम समाजाचे धर्मगुरू असलेल्या मौलवींनी ॲड. प्रकाश आंबेडकरांना मतदान करण्याचे आवाहन का केले? या कारणावरून काँग्रेस नेते साजिद खान पठाण यांनी मौलवी यांना शिवीगाळ केल्याचा आरोप वंचित आघाडीने केला आहे. सोबतच ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द बोलून मौलवी यांना भ्रमणध्वनीवरून धमक्या दिल्याचे वंचितच्या तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन साजिद खान पठाण यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी केली. या संदर्भातील तक्रार वंचित आघाडीने शहर कोतवाली, जुने शहर, डाबकी रोड, अकोट फैल पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली आहे. यावेळी वंचित आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : बुलढाण्यावर पाणी टंचाईचे सावट! येळगाव धरणात १५ टक्के जलसाठा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या प्रकरणाला लोकसभा निवडणुकीची किनार आहे. २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने अल्पसंख्याक उमेदवार दिल्याने निवडणुकीला जातीय रंग चढून भाजपने एकतर्फी बाजी मारली होती. यावेळेस काँग्रेसने आणखी एक प्रयोग करून मराठा समाजाला प्रतिनिधित्व दिले. यंदा अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील व वंचित आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत झाली. अकोला मतदारसंघात मुस्लिमांचे १७ ते १८ टक्के गठ्ठा मतदान आहे. त्यामुळे मुस्लिमांची मते निर्णायक होती. काँग्रेस व वंचितच्या दृष्टीने मुस्लिमांची मते केंद्रस्थानी होती. दोन्ही पक्षामध्ये मुस्लिम मतांसाठी चढाओढ लागली होती. मुस्लिम मतपेढी कायम ठेऊन इतर मते मिळवण्यासाठी काँग्रेसने अतोनात प्रयत्न केले, तर मुस्लिमांची गठ्ठा मते मिळविण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी देखील प्रतिष्ठा पणाला लावली होती. निवडणुकीनंतर मुस्लिम मतांचा कल कुणाकडे राहिला, यावरून वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. ४ जूनला होणाऱ्या मतमोजणीनंतरच ते स्पष्ट होईल. निवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया पार पडली असली तरी मुस्लिम मतांवरून काँग्रेस व वंचितमधील वाद कायम असल्याचे दिसून येते. वंचितने दिलेल्या तक्रारीवर पोलीस काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.