अमरावती : “हमारी बच्ची को सीबीएसई स्कूल मे पढाना, उसका ख्याल रखना..” असे अखेरचे शब्द लिहून येथील २३ वर्षीय एका आईने आपली जीवनयात्रा संपवली. चार महिन्यांपूर्वी चौकात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून या महिलेच्या पतीची हत्या करण्यात आली होती. पतीच्या अकाली मृत्यूमुळे तिला धक्का बसला होता. अखेरीस तिने टोकाचे पाऊल उचलत स्वत:चे जीवन संपविले. या दाम्पत्याची अवघी सहा महिन्यांची मुलगी आई-वडिलांच्या मायेला पोरकी झाली आहे.
इशिका ऊर्फ ज्युली आदर्श गुप्ता (२३, रा. मसानगंज) असे मृत महिलेचे नाव आहे. ईशिका यांचे पती आदर्श गुप्ता यांची २ मार्चला शहरातील टांगापाडाव चौकात क्षुल्लक कारणावरुन हत्या झाली होती. पतीच्या आकस्मिक मृत्यूमुळे इशिका हिला जबर धक्का बसला होता. ती पती विरहात विमनस्क अवस्थेत होती. इशिकाने काल घरातच ओढणीने पंख्याला गळफास लावून जीवन संपवले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरुन एक चिठ्ठी ताब्यात घेतली. त्यामध्ये लिहिले आहे की, ”पतीशिवाय मला जगणे अशक्य आहे. त्यामुळे हा निर्णय घेत आहे. आई, वडिलांनी माझे लग्न अतिशय उत्तम व्यक्तीसोबत लावून दिले होते, मात्र माझे नशीबच चांगले नव्हते. ते (पती) आता जगात नाही, त्यामुळे जगणे कठीण आहे, मी सुध्दा आता त्यांच्याजवळ जात आहे, त्यामुळे मला माफ करा,” असा उल्लेख चिठ्ठीत असल्याचे नागपुरी गेट पोलिसांनी सांगितले.
गुप्ता कुटुंबीयांवर अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीत झालेला हा दुसरा मोठा आघात आहे. २ मार्चला तरुण मुलगा क्षणात गेला आणि त्यानंतर अवघ्या ११५ दिवसांनीच त्यांची स्नुषासुध्दा जग सोडून गेली. इशिकाच्या मागे अवघ्या सहा महिन्यांची तान्हुली ‘आदर्शिका’ आहे. या घटनेने गुप्ता कुटुंबीयांवर दु:खाचा कोसळला आहे. या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.
अक्षरांचा योग जुळवून ‘आदर्शिका’ !
“आदर्शची आणि माझी ईच्छा होती की, मुलीला खूप शिकवायचे, तिला उत्तम शिक्षण द्यायचे. आता मात्र ही जाबाबदारी मम्मी व पप्पांनी घ्यावी. आमच्या मुलीला सीबीएसई शाळेमध्ये शिकवावे”, असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. आदर्श व ईशिका यांनी मुलीचे नाव दोघांच्या नावातील अक्षरांचा योग जुळवून ‘आदर्शिका’ असे ठेवले. मात्र आता ही चिमुकली आई-वडिलांच्या मायेला पोरकी झाली आहे.