चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील वाहनगाव, बोथली, रेंगाबोडी या गावांत शेतकऱ्यांच्या बांधावर जावून महसूल व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोयाबीन, कपाशी या शेतमालाची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ५५ हजार हेक्टर सोयाबिनचे नुकसान झाले आहे. पंचनामे पूर्ण होताच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना भरीव मदत दिली जाईल, अशी ग्वाही दिली. या शेतमालाची पाहणी करण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील रविवार ८ ऑक्टोबर रोजी चिमूर तालुक्यातील वाहनगाव, बोथली, रेंगाबोडी या गावातील बांधावर पोहोचले. यावेळी त्यांचे सोबत खासदार अशोक नेते, आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम. यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि विविध विभागाचे प्रमुख होते.

यावेळी विखे पाटील म्हणाले, कपाशीलासुध्दा मोठ्या प्रमाणात मार बसला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला तात्काळ नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच पिकांवर खोडकिडीचाही प्रादुर्भाव आढळला असून कृषी शास्त्रज्ञांकडून त्याचे निरीक्षण केले जाईल. चिमूर तालुक्यातील वाहनगाव येथील नथ्थुजी रणदिवे यांच्या शेतातील नुकसानग्रस्त सोयाबीनची, बोथली येथील सुधाकर बरडे यांच्या शेतातील कपाशी आणि रेंगाबोडी येथील गजानन ठोंबरे यांच्या शेतातील सोयाबीनची पाहणी केली. चिमूर येथील पंचायत समितीच्या सभागृहात आढावा घेतांना विखे पाटील म्हणाले, घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना जवळचे रेती डेपो उपलब्ध झाले पाहिजे. त्यादृष्टीने महसूल प्रशासनाने नियोजन करावे. विनाकारण वाळूसाठी घरकुलच्या लाभार्थ्यांना आर्थिक भुर्दंड पडायला नको.

हेही वाचा : काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या बालेकिल्ल्यात भाजपची ओबीसी जागर यात्रा, काय म्हणाले आशीष देशमुख ?

चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत तसेच चिमूरच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी आणि निवासी वसाहतींकरीता निधीमागणीचा प्रस्ताव पाठवावा. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत चंद्रपूर जिल्ह्यात चांगले काम झाले आहे. तरीसुध्दा पंचायत समिती स्तरावर किंवा मंडळनिहाय कार्यशाळा घेऊन या योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा. जेणकरून जास्तीत जास्त शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होऊ शकतील, अशा सुचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. यावेळी वीज पडून बैल मृत्युमुखी पडल्यामुळे रतिराम गायकवाड आणि गणेश देवतळे यांना महसूलमंत्र्यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला.

हेही वाचा : साडेचार क्विंटल गोमांसाची तस्करी, दोन आरोपी ताब्यात

सादरीकरण करतांना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले की, जिल्ह्यात ५७ टक्के हेक्टरवर ई –पीक पाहणी प्रयोग झाले असून लवकरच १०० टक्के ई-पीक पाहणी करण्यात येईल. तसेच ई- फेरफार आणि ई- चावडी उपक्रम राबविण्यात येत आहे. गत दोन महिन्यात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ६१ हजार ४३० हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ६८ हजार असून यांपैकी ५८ हजार शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यात ४० पैकी ३८ वाळू घाटांचे लिलाव करण्यात आले आहे. यातून २८ कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात ३० वाळू डेपोचे नियोजन करण्यात आले आहे. गौण खनीज मधून ६४ टक्के वसूली करण्यात आली असून अवैध उत्खनन व वाहतुकीतून २ कोटी १ लक्ष रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

हेही वाचा : ‘हे’ भाजपला महागात पडेल, रविकांत तुपकर म्हणाले ‘सर्वाधिक आमदार विदर्भात असूनही…’

चिमूर जिल्ह्याची निर्मिती करावी

आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांनी घरकुलच्या लाभार्थ्यांना जवळच्या घाटावरून वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच चिमूर येथे आज संपूर्ण प्रशासन आले आहे. येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालयसुध्दा कार्यान्वित झाले असून लवकरच स्वतंत्र चिमूर जिल्ह्याची निर्मिती करावी, अशीही मागणी त्यांनी केली.