नागपूर: महावितरणच्या मनुष्यबळ पुनर्रचनेला विद्युत क्षेत्रातील कामगार संघटनांकडून विविध मुद्दे उपस्थित करून कडाडून विरोध केला जात आहे. परंतु या पुनर्रचनेबाबत महत्वाची अपडेट पुढे येत आहे. महावितरणच्या संचालक (संचलन प्रकल्प) सचिन तालेवार यांनी नुकतीच नागपूरात झालेल्या बैठकीत महत्वाची माहिती दिली आहे.
महावितरणच्या विद्युत भवनात झालेल्या बैठकीत सचिन तालेवार म्हणाले, नागपूर परिमंडळात मागील दोन आठवड्यांपासून मनुष्यबळ पुनर्रचना लागू आहे. पुनर्रचनेचे उद्दिष्ट स्पष्ट करत तालेवार पुढे म्हणाले, यापूर्वी वीज अभियंते आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांवर वीजपुरवठा, वीजबिल वसुली अशा अनेक कामांचा ताण होता. नव्या पुनर्रचनेत हा ताण कमी करून कर्मचाऱ्यांवर निवडक आणि केंद्रित स्वरूपाच्या कामांची जबाबदारी दिली गेली. यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल. त्याचा सकारात्मक परिणाम ग्राहकांना मिळणाऱ्या दर्जेदार सेवेवर होईल. संचालक तालेवार यांनी यावेळी वीज कर्मचाऱ्यांना बदल मनापासून स्वीकारण्याचे आवाहन केले.
तालेवार म्हणाले, ग्राहकांना महावितरणकडून उत्तम सेवेची खूप अपेक्षा आहे. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सेवेप्रती व्यावसायिक दृष्टिकोन बाळगणे आवश्यक आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करा, तक्रारींचा निपटारा वेळेत करा आणि वसुलीचे लक्ष्य शंभर टक्के गाठा. या बैठकीला नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे, संजय वाकडे, मंगेश वैद्य आणि स्मीता पारखी यांचेसह नागपूर परिमंडलातील सर्व कार्यकारी अभियंते उपस्थित होते.
बदल अधिक ग्राहक-केंद्री करण्यासाठी सूचना द्या…
महावितरणने पुनर्रचनेचे प्रारूप लागू करताना ते अधिकाधिक प्रभावी कसे होईल यावर भर दिला आहे. तालेवार यांनी या बदलांच्या अंमलबजावणी दरम्यान येणाऱ्या पारिस्थितिनुसार दुरुस्ती करण्याची तयारी दर्शवली. त्यांनी यावेळी कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला आवाहन केले की, पुनर्रचना अधिकाधिक ग्राहक केंद्रित होण्यासाठी आपल्याला बदल आवश्यक वाटत असल्यास, त्याची निकड आणि कारण स्पष्ट करून तुमच्या सूचना जरूर द्या, असेही तालेवार म्हणाले.
रौशनी फाऊंडेशनतर्फ़े नेत्रदानाविषयी मार्गदर्शन
निवृत्त वीज कर्मचा-यांनी नेत्रदानाविषयी जनजागृती करण्यासाठी स्थापित रौशनी फाऊंडेशनचे राजेंद्र जैंन यांनी यावेळी मारणोपरांत नेत्रदानाचा उद्देश आणि कार्य याबाबत महावितरणच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना माहिती दिली. तसेच नेत्रदानाची आवश्यकता व महत्व सांगून मरणोपरांत नेत्रदान करण्याचे आवाहन केले. जास्तीतजास्त लोकांनी मरणोपरांत नेत्रदान करुन नेत्रहीन व्यक्तींचे जीवन सुकर करण्याचे आवाहनही यावेळी केले गेले.
