नागपूर : उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी हद्दीतून नागपूर ग्रामीण पोलिसांनी चंद्रपूर- नागपूर रोडवर एका ट्रकमधून तब्बल ५० लाखांचा गांजा जप्त केला आहे. त्यामुळे नागपुरातून गांजाची तस्करी होते काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. शब्बीर जुममे खान (३०) रा. मनपूर करमाला, जोगवा ता रामगड जी अलवर (राजस्थान), मूनवर आझाद खान (२८) रा. शहापूर नगली ता नुह जी मेवात (हरियाणा), गाडी मालक हाफिज जुमे खान रा. यामुनानगर (हरियाणा) अशी सगळ्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, गुरूवारी नागपूर ग्रामीण पोलिसांकडून बुट्टीबोरी हद्दीत नागपूर- बुटीबोरी महामार्गावर गस्त घातली जात होती.

हेही वाचा : ४५ खासदार निवडून आणण्याचा संकल्प, राज्यातील सर्व जिल्ह्यांत एकाच दिवशी महायुतीचा महामेळावा

दरम्यान, पोलिसांची नजर एका संशयास्पद हालचाल करणाऱ्या ट्रकवर पडली. पोलिसांनी ट्रकला थांबवून झडती घेतली असता त्यात तब्बल ४९५ किलो ६०० ग्राम गांजा असल्याचे निदर्शनात आले. ५० लाखांचा गांजा बघून पोलिसांचेही धाबे दणाणले. तातडीने ही माहिती वरिष्ठांना देत सदर २० लाखांचा ट्रकसह गांजाही जप्त केला गेला. त्यापूर्वी सगळ्या आरोपींवर बुटीबोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सगळ्यांना अटकही करण्यात आली. ही कारवाई नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांच्या सूचनेवरून स्थानिक गून्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, आशीष मोरखडे, बट्टूलाल पांडे अरविंद भगत, गजेंद्र चौधरी, मिलिंद नांदुरकर, संजय बांते, मयूर ढेकळे, सत्यशील कोठारे, अमृत किनगे, रोहन डाखोरे आणि इतरांनी केली. याप्रसंगी दोन्ही आरोपींकडून दोन मोबाईलही जप्त केले गेले.

हेही वाचा : वाशीम : विकसित भारत संकल्प यात्रेला संमिश्र प्रतिसाद!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्रक चालकांच्या संपातही अंमली पदार्थाची तस्करी

नागपूरसह राज्यातील अनेक भागात केंद्र सरकारच्या हिट ॲन्ड रन कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांकडून संप पुकारण्यात आला आहे. संपामुळे नागपूर जिल्ह्यातील निम्मे मालवाहू ट्रकांचे चाक थांबले आहे. परंतु या संपातही पोलिसांनी कारवाई करून ५० लाखांचा गांजा जप्त केल्याने काही ट्रक चालकांकडून अवैधरित्या अंमली पदार्थाची मालवाहतूक होत असल्याचे पुढे येत आहे. सदर प्रकरणात प्राथमिक माहितीनुसार हा गांजा विशाखापट्टणमवरून बिहारला जात असल्याचे पुढे येत आहे. परंतु पोलिसांच्या सखोल चौकशीतच खरी माहिती पढे येणार आहे.