यवतमाळ : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात दरदिवशी महायुतीच्या उमेदवाराचे नाव बदलत असल्याने इच्छुक उमेदवारांच्या समर्थकांचे दडपण वाढले आहे. भावना गवळी याच उमदेवार असल्याचे सांगितले जात असताना, शनिवारी त्यात एकदम ‘ट्वीस्ट’ निर्माण झाला. गवळी नकोच, हा भाजपचा व्होरा कायम असल्याने अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यवतमाळ-वाशीम मतदारसंघात तातडीने सर्वेक्षणासाठी १५ निरीक्षकांची चमू पाठवली. त्यामुळे येथील महायुतीचा उमेदवार कोण? याबाबत उत्सुकता प्रचंड ताणली गेली आहे.

महायुतीकडून यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट)चा उमेदवार राहील, हे जवळपास निश्चित आहे. मात्र उमेदवारीबाबत अद्यापही एकमत झालेले नाही. विद्यमान खासदार गवळी, मंत्री संजय राठोड आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांची नावे चर्चेत आहेत. याच आठवड्यात गवळी यांनी मुंबईत जावून मुख्यमंत्र्यांकडून महायुतीच्या उमेदवार त्याच असतील, असा शब्द आणला होता. त्यानंतर यवतमाळात गुरुवारी त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली. यावेळी गवळी यांच्या समर्थकांनी पेढे भरवून एकमेकांचे तोंडही गोड केले होते. या घडामोडी घडत असताना, शुक्रवारी पुन्हा हवा बदलली. राठोड मुंबईत ‘सागर’ बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले. त्यावेळी भाजपकडून राठोड यांनाच निवडणूक लढविण्याच्या सूचना करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. मात्र, राठोड यांनी लोकसभेसाठी अनिच्छा दाखविल्याचे सांगण्यात येते.

BJP candidate Vishwadeep Singh
भाजपा उमेदवाराचे वय १० वर्षात १५ वर्षांनी वाढले?; समाजवादी पार्टीचा आक्षेप, निवडणूक आयोगाकडे तक्रार
Narendra Modi, Kanhan, Nagpur,
‘बेरोजगारी, महागाईबाबत मोदी अपयशी, मात्र राम मंदिर…’, कन्हान येथे पंतप्रधानांच्या सभेला आलेल्या नागरिकांचे मत
uddhav thackeray eknath shinde (2)
ठाकरे गटाचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? अयोध्या पौळ माहिती देत म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या…”
wealthy MP Bhandara
मागासलेल्या भंडाऱ्याचे श्रीमंत खासदार, मेंढे दाम्पत्याकडे १०१ कोटींहून अधिक संपत्ती…

हेही वाचा : अमरावतीत उमेदवारीवरून शिवसेना उद्धव ठाकरे गटातही नाराजीचा सूर, दिनेश बुब यांच्या समर्थनार्थ मेळावा

गवळी यांच्याबाबत भाजपश्रेष्ठी अजूनही अनुकूल नसल्याचे बोलले जाते. शिवसेनेचा उमेदवार बदला किंवा भाजपच्या उमेदवाराला संधी द्या, असा थेट निरोप भाजपने दिला असल्याचे कळते. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी यवतमाळ-वाशीममध्ये गवळी यांच्याबाबत पक्षाचे पदाधिकारी, नागरिकांचे नक्की काय म्हणणे आहे, याची खातरजमा करण्यासाठी थेट १५ निरीक्षकांची चमू मतदारसंघात पाठवली आहे. या चमूत मुंबई, नागपूर आदी ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. चमूने शनिवारी सकाळपासून गटागटाने मतदारसंघाचा आढावा घेतला. यवतमाळ येथे हॉटेल राधेमंगलममध्ये पदाधिकाऱ्यांशी विधानसभानिहाय चर्चा केली. निरीक्षकांच्या अहवालावरच गवळी यांची उमेदवारी अवलंबून असल्याचे एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. अहवाल सकारात्मक असल्यास मुख्यमंत्री गवळी यांनाच उमेदवारी देतील, असे सांगण्यात येते. मात्र निरीक्षकांचा हा अहवाल ‘निगेटिव्ह’ असल्यास यवतमाळ-वाशीममध्ये उमेदवार बदल होणार, हे निश्चित मानले जात आहे.

हेही वाचा : वर्धा : मी शंभर टक्के पवारांचा उमेदवार…..काँग्रेसच्या माजी आमदाराने तुतारी….

गवळी, राठोड की मनीष पाटील?

भावना गवळी यांना उमेदवारी नाकारल्यास जातीय मतांचे प्राबल्य लक्षात घेवून संजय राठोड किंवा मनीष पाटील यांच्या गळ्यात उमदेवारीची माळ पडण्याची शक्यता आता व्यक्त होत आहे. यवतमाळ-वाशीम मतदारसंघात कुणबी, मराठा, बंजारा, आदिवासी समाजाचे प्राबल्य आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख उमेदवार राहणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महायुतीसुद्धा मराठा, कुणबी समाजाचा उमेदवार देण्यावर गांभीर्याने विचार करत असल्याचे सांगण्यात येते. असे झाल्यास या मतदारसंघातील लढत तुल्यबळ होईल.