यवतमाळ – जिल्ह्यात खुनाचे सत्र सातत्याने सुरू असल्याने नागरिकांत दहशत पसरली आहे. मंगळवारी आणि शुक्रवारी यवतमाळ शहरात पूर्व वैमनस्यातून दोन खून झाले. या खुनाची शाई वाळते न वाळते तोच उमरखेडमध्ये रविवारी रात्री एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. शेख अजहर शेख अकबर (२७, रा. अब्दुल रहमान कॉलनी, उमरखेड) असे मृताचे नाव आहे. जुन्या वादाचा राग मनात ठेवून तिघांनी मिळून एका तरुणावर चाकूने सपासप वार करत निर्घृण खून केल्याची थरारक घटना यवतमाळ शहरातील उमरसरा परिसरात शुक्रवारी घडली. या हल्ल्यात सूरज कानबा गाताडे (२१) या युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये दोन आरोपी अल्पवयीन आहे.
उमरखेड शहरातील आठवडी बाजार परिसरात रविवारी मध्यरात्री दोन गटांमध्ये भीषण हाणामारी झाली. या चकमकीत तलवार, चाकू, लोखंडी रॉडने सपासप हल्ला करून शेख अजहर शेख अकबर या युवकाचा खून करण्यात आला. या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात पाच आरोपींच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आणखी तीन ते चार संशयितांचा शोध सुरु आहे.
शेख अजहर शेख अकबर हा मजुरीचे काम करत होता. मृताचा मोठा भाऊ शेख खालीद शेख अकबर (३५), याने पोलिसात भावाच्या खुनाची तक्रार दाखल केली. ताजपुरा वॉर्डात संध्याकाळी दोन गटांत वाद झाला होता. त्याचेच पर्यवसान मध्यरात्री आठवडी बाजार परिसरात पुन्हा एकदा गटगटातल्या हाणामारीत झाले. या हल्ल्यात शेख मुदस्सीर शेख जमील, शेख सोहेल शेख जमील (दोघे रा. ताजपुरा वॉर्ड), शेख उबेद निसार (रा. ताजपुरा वॉर्ड), शेख आरीश शेख खतीब (रा. हुतात्मा चौक) आणि त्यांच्या सोबत असलेल्या ३ ते ४ साथीदारांनी मिळून अजहरवर हल्ला केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत. शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
यवतमाळात दोन खून
आरोपी गटटु भोयर, (२०), दोन्ही रा. गणेशनगर उमरसरा यवतमाळ याला अटक केली असून, दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. मृत सुरज व आरोपी यांच्यात भंगार विक्रीच्या कारणावरून वाद झाला होता. त्याचाच राग मनात ठेवून हा खून करण्यात आला. या प्रकरणी अवधुतवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तत्पूर्वी मंगळवारी स्थानिक महादेव मंदिर परिसरात चांदणी चौकात मनीष शेंद्रे, रा. रमाईपुरा-पाटीपुरा या तरुणावर चाकूने वार करून खून करण्यात आला. कळंब चौक परिसरात काही महिन्यांपूर्वी झालेल्या एका युवकाच्या खुनाच्या आरोपात कारागृहात असलेला मनीष जामिनावर बाहेर आला होता. ही संधी साधून मारेकऱ्यांनी त्याला संपविले. यवतमाळ शहरात व जिल्ह्यात सातत्याने खुनाच्या घटना घडत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे