गोंदिया: रोहिणी नक्षत्र वादळ वारा आणि तुरळक प्रमाणात पाऊसा सह संपले, मृग नक्षत्रात ही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी ठप्प झाली आहे. दर वर्षी प्रमाणे पावसाच्या लवकर आगमनाच्या अपेक्षेने शेतीची मशागतीची कामे उरकलेले शेतकरी आता टक आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत.

जून महिना मध्यावर आला असतानाही अजून पर्यंत पावसाने हजेरी लावलेली नाही. यामुळे खरीप हंगामाच्या नियोजनात अडथळे येत असून वेळेवर लागवड न झाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

धानाचा रब्बी हंगाम संपताच शेतकऱ्यांनी मशागतीची कामे नांगरणी, तृण वेचने, शेतातील केर कचरा जाळणे या सह शेतीतील इतर आवश्यक कामे युद्ध पातळीवर पार पाडली. काही शेतकऱ्यांनी तर जुळवा जुळव करून शेतीला लागणारे बी- बियाणे ही साठवून ठेवले आहेत. पावसाच्या पहिल्या सरी पडल्यानंतर पेरणी करण्यासाठी सर्वत्र बळीराजा पूर्णपणे सज्ज आहे. मात्र, वरुण राजाची अवकृपा सध्या घडीला सुरू असून आकाशात  ढगांची गर्दी असूनही अद्याप एकही ठोस पावसाची सर न झाल्यामुळे शेतकरी सध्या संभ्रमात आलेला आहे. हवामान विभागाने रोहिणी नक्षत्र सुरू असताना यंदा मान्सून वेळेवर दाखल होणार असा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे यावर विश्वास ठेवून  शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व आवश्यक असलेली मशागती ची कामे पूर्ण केली होती. मात्र सध्याच्या कोरड्या हवामानामुळे आशेवर पाणी फिरण्याची वेळ आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोंदिया जिल्ह्यातील बळीराजा आशेवर तग धरून आहे. दररोज पहाटे पाच वाजता शेतकऱ्यांचे काम सुरू होते. अश्यातच आज पाऊस येईल या आशेने अनेक जणांनी पुन्हा पुन्हा आकाशा कडे डोळे रोखून ठेवले आहेत. ढग दाटून आले की आशा अपेक्षा वाढते, पण काही तासातच ते विरघळून ही जाते. रोहिणी नक्षत्रच्या अपेक्षा भंगानंतर आता मृगावर लक्ष केंद्रित झाले आहे. या मृग नक्षत्रात जरी मुसळधार पाऊस झाला तर उशिरा का होईना खरीप हंगाम सुरू करता येईल अशी अपेक्षा अजूनही शेतकरी मनात शिल्लक आहे. गोंदिया जिल्ह्यातील खरीप हंगाम सध्या हवामानाच्या अनिश्चितेमुळे खोळंबला आहे. निसर्गाची थोडी साथ मिळाली तर, बळीराजाची तयारी पूर्ण आहे. पण सध्या संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी वर्गाच्या नजरा मात्र आकाशाकडेच आहेत.