नागपूर : काश्मीरला सहलीला गेलेल्या नागपूरसह विदर्भातील १६ पर्यटक श्रीनगर-जम्मू मार्गावर रात्रभर अडकले होते. सोबत महिला होत्या. मध्यरात्री अडचणीच्या वेळी राजौरी जिल्ह्यातील एका गावात तेथील स्थानिक व्यापाऱ्यांनी त्यांची त्यांच्या घरी भोजन व राहण्याची व्यवस्था केली.

सतीश इंगळे मुळचे वर्धेचे. ते व नागपुरातील काही असा १६ जणांचा समुह १६ तारखेला काश्मीर सहलीला नागपुरातून हमसफर एक्सप्रेसने निघाला होता. मंगळवारी ते सुद्धा पहलगामला भेट देण्यासाठी निघाले होते. वाटेत चंदनवाडीपर्यंत पोहचले. तेथून पहलगाम जवळ आहे. जाताने अमरनाथ यात्रेला जेथून सुरूवात होते त्या चंदनवाडीला काही काळ थांबले.

तेथे छायाचित्रे काढताना उशीर झाला. ते आटोपून पुढे जाण्यासाठी निघाले असतानाच त्यांना पहेलगामच्या घटनेची माहिती मिळाली. त्यामुळे परतले. दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर खोऱ्यातील सर्व पर्यटक एकाच वेळीपरतीच्या प्रवासाला लागल्याने श्रीनगर-जम्मू मार्गावर वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहने पर्यायी मार्गाने निघाले. ते ही मार्ग बंद झाले.

वाटेत एका तपासणी नाक्यावर इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांचे वाहन थांबवण्यात आले. ते गाव राजौरी जिल्ह्यातील भारत-पाक सीमेवरचे होते. रात्र झाल्याने राहायचे कुठे हा प्रश्न या समुहाला होता. सोबत महिलाही होत्या. अशा बीकट प्रसंगी त्यांना महामार्गावरील पेट्रोलपंपाचे मालक व व्यापारी मदतीला धावले. त्यांनी पुरुष पर्यटकांची व्यवस्था एका मंदिरात तर महिलांची व्यवस्था स्वत:च्या घरी उत्तमपणे केली, असे इंगळे यर्नी सांगितले.

वाहन चालकाने दिला धीर

काश्मीर दर्शनासाठी या समुहाने एक वाहन भाड्याने घेतले होते. त्यांच्यासोबत वाहनचालक नवज्योतसिंग हा आठ दिवसांपासून सोबत होता. पर्यटक अडचणीत सापडल्याचे लक्षात आल्यावर त्याने स्वत: त्याच्या घरी राहण्याची व्यवस्था करण्याची तयारी दर्शवली. त्याचे गाव दुर्गम भागात असल्याने तेथे जाण्यास पोलिसांनी मनाई केली. पण त्याने दाखविलेल्या औदार्याचा विशेष उल्लेख इंगळे यांनी केला.

जम्मूत प्रचंड गर्दी

खोऱ्यातील पर्यटक परत जाण्यासाठी एकाच वेळी जम्मूकडे निघाले. त्यामुळे तेथील सर्व हॉटेल्स फुल्ल झाली. कुठेही राहण्यासाठी जागा शिल्लक नाही, असे इंगळे म्हणाले. श्राीनगरमध्ये जे पर्यटक अडकले आहेत त्यांनाच फक्त सरकारकडून संपर्क साधला जात आहे. आम्ही परतीचे रेल्वे आरक्षण यापूर्वीच केले असल्याने आम्ही सरकारी मदतीच्या मागे न धावता पूर्वनियोजित रेल्वेनेच प्रवास करण्याचे ठरवले आहे. शुक्रवारी हा पर्यटक समुह नागपूरकडे निघणार आहे, असे इंगळे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अडकलेल्या प्रवाशांची संख्या वाढली

नागपूर जिल्ह्यातील २२० पर्यटक काश्मीरमध्ये अडकल्याचे बुधवारी जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. गुरुवारी त्यांनी पर्यटकांची सुधारित यादी जाहीर केली त्यात २५७ पर्यटकांचा समावेश आहे.