देवेंद्र गावंडे

विरोधक काहीही म्हणोत, पण पक्षाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने राज्याच्या उपराजधानीत झालेली राहुल गांधी व खरगेंची जाहीर सभा बऱ्यापैकी यशस्वी झाली असे म्हणता येईल. सततच्या अपयशाने आलेली अडगळ झटकण्यासाठी या सभेचा उपयोग होईल का हा आताचा खरा प्रश्न. काँग्रेसचा आजवरचा इतिहास चाळला तर अशा सभेपुरते पक्षाच्या नेत्यांमध्ये व कार्यकर्त्यांच्या वर्तुळात चैतन्य सळसळते. नंतर पुन्हा सारे ग्लानीत जातात. निवडणूक लागली की पुन्हा सारे सक्रिय होतात पण तोवर उशीर झालेला असतो. आता तर या पक्षासमोर किमान विदर्भात तरी भाजपसारखा तगडा प्रतिस्पर्धी आहे. हा पक्ष कायम निवडणुकांच्या मोडमध्ये असतो. शिवाय यांचे निवडणूक व्यवस्थापन सुद्धा वादातीत. त्याला तोंड देण्याची तयारी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आहे का? या सभेने पक्षश्रेष्ठींनी, त्यातल्या त्यात राहुल गांधींनी नाना पटोलेंच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. तेही जाहीरपणे. प्रत्यक्षात नाना एकट्याच्या बळावर यश मिळवू शकतात का? त्यांची आजवरची कार्यशैली काय दर्शवते? पक्षातील इतर नेते व नानांचे संबंध नेमके कसे आहेत? अंतर्गत कुरबुरी व गटबाजीचे सध्याचे स्वरूप काय याचा ऊहापोह यानिमित्ताने समयोचित ठरतो.

हेही वाचा >>> लोकजागर : बंदीमागचे ‘बाष्कळ’ सत्य!

गेल्या दोन वर्षांपासून नाना प्रदेशाध्यक्ष आहेत. या काळात सगळ्यांना सोबत घेऊन त्यांना सत्तेविरुद्ध रान पेटवता आले असते पण तसे घडले नाही. नाना एकीकडे व पक्षाचे झाडून सारे नेते दुसरीकडे असे चित्र कायम दिसले. अध्यक्ष झाल्यापासून नानांच्या महत्त्वाकांक्षेत वाढ झाली. त्यामुळे त्यांनी इतरांना खुजे ठरवण्याचा, त्यांच्याभोवती संशयाचे वादळ निर्माण करण्याचा, यावरून श्रेष्ठींचे कान भरण्याचा प्रयत्न सातत्याने केला. तो हाणून पाडण्यात उर्वरित सर्व नेत्यांची शक्ती खर्च झाली. पक्षाच्या दृष्टीने यातला चांगला भाग एवढाच की यापैकी एकाही नेत्याने हा वाद चव्हाट्यावर आणला नाही. तो श्रेष्ठींकडे तक्रारीपुरता सीमित राहील याची काळजी घेतली. सत्ता नसल्यामुळे आलेल्या शहाणपणाचा हा एकमेव पुरावा. नाना व या नेत्यांमध्ये समेट घडवून आणण्याचा सर्वाधिक प्रयत्न केला तो मल्लिकार्जुन खरगेंनी. नानांच्या आकंठ प्रेमात असलेल्या राहुल गांधींनी या नेत्यांकडे कायम दुर्लक्ष केले. आता निवडणूक जवळ आली असताना हे विसंवादाचे चित्र असेच राहिले तर पक्षाला खरोखर यश मिळेल का? राज्यात सेना व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष भाजपने पद्धतशीरपणे फोडले. उरली फक्त काँग्रेस. ती फुटेल की नाही हे येणाऱ्या काळात दिसेलच पण या पक्षातील नेत्यांविषयी संशयाचे वातावरण निर्माण करण्यात भाजपला चांगलेच यश आले. नाना हा संशय दूर करण्यासाठी झटण्याऐवजी त्याला खतपाणी घालत राहिले. हे चित्र पक्षासाठी आशादायी कसे म्हणता येईल? आजही या पक्षाकडे अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, बंटी पाटील यासारखे तगडे नेते आहेत. भाजपच्या आक्रमक प्रचाराला पुरून उरण्याची ताकद यांच्यात आहे. नागपूरच्या सभा आयोजनातही या सर्वांचा अर्थपूर्ण वाटा दखल घेण्याजोगा होता. अशास्थितीत या सर्वांना सोबत घेऊन चालण्याची जबाबदारी केवळ नानांची. ते ती खरोखरच पार पाडताहेत का?

नाना आक्रमक आहेत, ते संस्थानिक नसल्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या कारवाईच्या रडारवर नाहीत. हे खरे असले तरी राज्य सोडाच पण विदर्भात सुद्धा त्यांना सर्व नेत्यांना सोबत घेऊन काम करण्याशिवाय पर्याय नाही. असे केले तरच यश मिळू शकते. पक्षात असलेल्या सर्वांना विश्वासात घेत, त्यांच्यावरील संशयाचे मळभ दूर करण्यात पुढाकार घेत संपूर्ण राज्य पिंजून काढण्याची जबाबदारी नाना घेतील का? नाना तडफदार असले तरी एकट्याच्या बळावर सत्ता मिळवून देण्याएवढी त्यांची प्रतिमा अजून तयार झालेली नाही. या वास्तवाकडे त्यांनी लक्ष देण्याची गरज. त्यांच्यावर वरदहस्त असलेले दिल्लीचे नेते ‘जे जातील त्यांना जाऊ द्या’ असे म्हणत असले तरी राज्य व विदर्भातील यशापयशाची जबाबदारी नानांनाच घ्यावी लागणार. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तर एकजुटीचे चित्र निर्माण करणे हे नानांचे कर्तव्य ठरते. तशी तयारी ते नजीकच्या काळात दाखवतील का? पक्षातील इतर नेत्यांविषयी निष्ठेच्या मुद्यावरून संशयाचा धूर जाणीवपूर्वक पसरवला जात आहे हे बघून नानांविषयी सुद्धा त्याच चर्चा समोर आणल्या गेल्या. त्यांनी सत्तेशी जुळवून घेतले असा प्रचार सुरू झाला तो यातून. याचा फटका संपूर्ण पक्षालाच बसेल याची जाणीव नेत्यांना आहे का? आजच्या घडीला विदर्भात तरी काँग्रेससाठी कधी नव्हे एवढे अनुकूल वातावरण आहे. लागोपाठ आलेल्या दोन जनमत सर्वेक्षणातून हे स्पष्ट दिसले. विदर्भ हा काँग्रेससाठी कायम महत्त्वाचा प्रदेश राहिलेला. अशा सर्वेक्षणाने हुरळून जात काम न करताच जनता निवडून देईल हा फुकाचा आशावाद झाला. नेमका तोच या पक्षात अजून दिसतोय.

हेही वाचा >>> लोकजागर: सरकारी ‘सरबराई’!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे सर्वेक्षणातून समोर आलेले चित्र बदलण्याची ताकद भाजपमध्ये आहे. सामदामदंडभेद नीतीचा वापर करून हा पक्ष हरत असलेली बाजी पलटवू शकतो हे अनेकदा सिद्ध झालेले. विरोधक गाफील नाही तर तत्पर आहे याची जाण ठेवत नाना व त्यांच्या सहकाऱ्यांना प्रयत्न करणे गरजेचे. भविष्यात तसे घडताना दिसेल का? राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात विदर्भासाठी फार भरीव असे काहीही केले नाही. सरकारी योजनांचा निधी एकत्र करून केलेले पॅकेज शेतकऱ्यांच्या पचनी पडलेले नाही. अपवाद फक्त धानाला जाहीर केलेल्या बोनसचा. कापूस, तूर, सोयाबीन या पिकांचे काय हा प्रश्न आ वासून उभा आहे. संत्र्याच्या निर्यातीवर सरकारने सवलत दिली पण उशिरा. त्यामुळे उत्पादकांना फार फायदा मिळू शकला नाही. बेरोजगारांचा प्रश्नही गंभीर. आरक्षणावरून मराठ्यांसोबत वाद झाल्याने ओबीसींमध्ये कमालीची अस्वस्थता. हे सारे मुद्दे काँग्रेसला प्रचारात कामी येणारे पण नेते खरोखर असा प्रचार करतील का? सामान्य लोक सरकारला कंटाळलेले, त्यामुळे आपण फिरलो नाही तरी लोक पक्षाला मत देतील ही आळशी मानसिकता अजूनही काँग्रेसमध्ये भिनलेली. त्यामुळे गावपातळीपर्यंत कार्यकर्ता असूनही हा पक्ष भाजपच्या तोडीची आक्रमकता दाखवू शकत नाही. हे चित्र बदलण्याची धमक नाना दाखवतील का? गेल्या दोन दशकातील घटनाक्रम बघितला तर प्रत्येक मोठ्या निवडणुकीच्या आधी राहुल गांधी विदर्भात येऊन गेलेले. त्यांच्या सभेने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारतो पण त्याचे रूपांतर निवडणुकीच्या यशात होत नाही. असे का यावर पुन्हा विचार करण्याची वेळ आताच्या सभेने पक्षनेत्यांवर आणलेली. आत्मपरीक्षणाचा गुण हा राजकीय नेत्यांसाठी केव्हाही फायद्याचा. नेमका त्याचाच अभाव काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांमध्ये दिसतो. यामुळे राहुल गांधींची मेहनत दरवेळी वाया जाते. यावेळी तसे होऊ द्यायचे नसेल तर नानांना त्यांच्यात सर्वसमावेशकता भिनवावी लागेल. सर्वांना विश्वासात घ्यावे लागेल. तशी तयारी ते दाखवतील का हा कळीचा मुद्दा.devendra.gawande@expressindia.com