अमरावती :  महायुती सरकारला सत्तेची घमेंड आली आहे. कारण हे सरकार ‘इव्हीएम’ घोटाळा करून सत्तेत आलेले आहे. राज्यातील शेतकरी, वंचित, दलित, आदिवासी या घटकांकडे दुर्लक्ष करत आहे, पण आम्हाला शहीद व्हायला भाग पाडू नका, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी मोझरी येथे दिला.

माजी आमदार बच्चू कडूंच्या आंदोलनाला महादेव जानकर यांनी पाठिंबा दिला, त्यावेळी ते बोलत होते. गेल्या आठ जून पासून मोझरी येथे बच्चू कडू यांचे उपोषण सुरू असून आज उपोषणाच्या चौथ्या दिवशी महादेव जानकर यांनी बच्चू कडू यांची उपोषणस्थळी भेट घेतली. 

यावेळी बोलताना महादेव जानकारांनी महायुतीवर जोरदार टीका केली. जानकर म्हणाले,  महायुतीला सत्तेत आणण्यात आमचा मोठा वाटा आहे. पण याचा आता पश्चाताप होतोय, यासाठी मी शेतकऱ्यांची माफी मागतो. महायुतीचे सरकार  सत्तेत आल्यापासून शेतकरी, दलित, ओबीसी या समाजाकडे दुर्लक्ष करत आहे, समाजाचा निधी हा रस्त्यासाठी खर्च करत आहे. हे लबाड सरकार आहे. यांना सत्तेच्या बाहेर बसवले पाहिजे, असे आवाहन शेतकऱ्यांना जानकर यांनी केले.

सरकार जाती-जातीत आणि धर्मा-धर्मात भांडणे लावून  शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न  करत आहे. कारण हे सरकार अदानी, अंबानीचे आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे नाही तर हे भांडवलदारांचे सरकार आहे, असा गंभीर आरोप जानकर यांनी केला. जर या सरकारला अद्दल घडवायची असेल तर आपण सर्वांनी बच्चू कडूंना पाठिंबा दिला पाहिजे. म्हणूनच मी आज  बच्चू कडू यांना पाठिंबा द्यायला आलो आहे, असे जानकर म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंदोलनाला अनेक नेत्यांचा पाठिंबा मिळत आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, शेतमजुरांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याला विमा संरक्षण मिळावे, शेतमजुरांचे आर्थिक हित जपण्याकरिता स्वतंत्र मंडळाची उभारणी व्हावी, लागवड ते कापणीपर्यंतच्या सर्व शेतीकामांचा समावेश महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत करावा. हे शक्‍य नसल्यास तेलंगणाच्या धर्तीवर एकरी १० हजार रुपयांची मदत देण्यात यावी. रासायनिक खतांप्रमाणे सेंद्रिय तसेच मेंढी खतालादेखील अनुदान देण्याची तरतूद करण्यात यावी, दुधातील भेसळ रोखत गाईच्या दुधाला ५० रुपये तर म्हशीसाठी ६० रुपये प्रतिलिटर असा दर निश्‍चित करावा, या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी हे आंदोलन सुरू केले आहे.