वर्धा : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा दौरा अखेर निश्चित झाल्याने पालकमंत्री व चारही आमदार यांना हायसे झाले आहे. रविवारी रात्री मुख्यमंत्री दौरा आला. तोपर्यंत येणार की नाही अशी शंका व्यक्त केल्या जात होती. त्यातच पावसाळी वातावरण व हलक्या सरी, अशी स्थिती असल्याने मुख्यमंत्री बोलणार कुठे, हा प्रश्न आलाच. मग वॉटरप्रूफ मांडव टाकण्याची बाब समोर आली. मांडव पण पडला.

आता मुख्यमंत्री तीन तास वर्धा शहरात असणार म्हणून चहापान तरी केले पाहिजे अशी भावना पुढे आली. जिल्हाध्यक्ष सुनील गफाट म्हणतात की, जिल्हा कार्यालयच्या भूमिपूजनप्रसंगी आम्ही कार्यकर्ता संवाद ठेवला आहे. फडणवीस, पालकमंत्री व मी असे तिघेच बोलणार. त्याचवेळी चहापाणी होणार. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांना असेच कसे रिकाम्या पोटी पाठविणार, असा मुद्दा एका ज्येष्ठ संघ संस्कारीत भाजप नेत्याने उपस्थित केला. तर पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे शेड्युल खूप टाइट आहे. पण त्यांनी या वर्धा नगरीत किमान आदरातिथ्य स्वीकारावे अशी इच्छा आहे. बघू काय व कसे साध्य होते ते.

प्राप्त माहितीनुसार मुख्यमंत्री फडणवीस दोन शासकीय व तीन सर्वजनिक कार्यक्रम करणार असल्याने शासकीय पातळीवार पण चहापान मुद्दा आहेच. शिवाय दोघांनी आमच्याकडेच चहा घ्या, असा मेसेज टाकून ठेवल्याची माहिती ऑफ दी रेकॉर्ड दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिनांक १२ मे रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा असा राहणार

सोमवार दिनांक १२ मे रोजी सायंकाळी ४.२० वाजता ईव्हेंट सभागृह येथे सेवा पंधरवडा समारोप, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थित राहतील. सायंकाळी ५.३५ भाजपा जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन करतील. सायंकाळी ६ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे दर्शन व स्मरणिका विमोचन कार्यक्रमास उपस्थित राहतील. सायंकाळी ६.२५ वाजता शहीद भगतसिंग मैदान, रामनगर येथे देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास उपस्थित राहतील. जिल्ह्यातील भाजप आमदार सुमित वानखेडे, दादाराव केचे, समीर कुणावार व राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट हे प्रामुख्याने स्वागत तयारीत आहे. पालकमंत्री डॉ. भोयर यांच्याकडे विशेष जबाबदारी आहे.