चंद्रपूर : आगामी लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा तसेच ब्रह्मपुरी, चिमूर, वरोरा आणि बल्लारपूर विधानसभा मतदार संघात भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी तेली समाजाला उमेदवारी न दिल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे नवनियुक्त राज्य उपाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी दिला आहे. आम्ही भाजप, काँग्रेस तसेच इतर साऱ्याच पक्षाला विनंती करू, जे पक्ष तेली समाजाला उमेदवारी देतील त्याच पक्षाला मतदान केले जाईल, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची राज्यस्तरीय कार्यकारिणी सभा १० सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. या सभेत चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी अजय वैरागडे, युवा जिल्हा अध्यक्ष नीलेश बेलखेडे, युवा जिल्हा कार्याध्यक्ष आशिष देवतळे, -महिला जिल्हाध्यक्ष श्रुती घटे यांची नियुक्ती करण्यात आली. पत्रपरिषदेत अधिक माहिती देताना देवतळे म्हणाले, संभीजनगरच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्यांनी तेली समाजाला तेली घाणी महामंडळ स्थापित करून दिले आहे; त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेदेखील श्री संताजी तेली घाणी महामंडळ स्थापन करून द्यावे.

हेही वाचा >>>बैलजोडीचे पूजन करून ओबीसींचे आंदोलन; विविध संघटनांचा वाढता पाठिंबा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रातील सर्व समाजांची जातनिहाय जनगणना करावी व त्या- त्या जातिसंख्येनुसार त्यांना योग्य प्रमाणात आरक्षण द्यावे तसेच ५० टक्के आरक्षणाची मर्यादा केंद्र सरकारकडून विधेयक मंजूर करून वाढविण्यात यावी. श्री संताजी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून त्याकरिता १००० कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमची हरकत नाही. परंतु, ओबीसींच्या तुटपुंज्या मिळणाऱ्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना स्वतंत्र वेगळे आरक्षण द्यावे. मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याकरिता जी समिती नेमण्यात आलेली आहे ती समिती रद्द करावी व मराठा समाजाला कुणबीमध्ये समावेश करण्यासाठीचे दाखले देऊ नये. मुंबई येथे तेली समाज भवनासाठी चार एकर जागा अल्प किमतीत उपलब्ध करून द्यावी. ओबीसी प्रवर्गाला आरक्षण सध्या मिळत आहे त्यातील तेली प्रवर्गाला वेगळे आरक्षण करून द्यावे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहे सुरू करावीत. शालेय अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकात संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांचा धडा असावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच सुरू केलेली विश्वकर्मा योजना यामध्ये तेली समाजाचा समावेश करावा, असे महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आल्याचे देवतळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.