नागपूर : राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली असून १३ ते १५ ऑगस्टदरम्यान राज्यातील काही भागात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी विजांचा कडकडाट आणि ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. समुद्रसपाटीवरील मोसमी पाऊस द्रोणिका भटिंडा, पटियाला, देहरादूनमार्गे जात हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या अरुणाचल प्रदेशापर्यंत पूर्व-दक्षिणपूर्व दिशेला पसरली आहे.

समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर बंगालच्या उपसागराच्या मध्य भागावर चक्री फिरते प्रणाली स्थित आहे. त्याच्या प्रभावाखाली १३ ऑगस्टला बंगालच्या उपसागराच्या पश्चिम-मध्य व लगतच्या उत्तर-पश्चिम भागावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासात ते अधि तीव्र होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागराच्या मध्य भागातील चक्री फिरत्या प्रणालीपासून ते उत्तरअंतर्गत कर्नाटकावरील चक्री फिरत्या प्रणालीपर्यंत, पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावरुन जाणारी पूर्व-पश्चिम दिशेची द्रोणिका ५.८ किलोमीटर उंचीवर कायम आहे.

त्यामुळे राज्यातील कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याशिवाय, मध्य महाराष्ट्रातील काही भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. या काळात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. १३ ऑगस्टला चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमधील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजांच्या कडकडाटासह ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. मुंबईत देखील १३ ऑगस्टला मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अधूनमधून पाऊस पडत असला तरी, यावेळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने महाराष्ट्रात पुढील पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणातही बहुतांश ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. ठाण्यासह पुण्यात सातारा, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, कोल्हापूरमध्येही यलो अलर्ट असणार आहे. तर मराठवाड्यात लातूर धाराशिव, बीडमध्येही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात उद्यापासून तीन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

त्यामुळे हवामान विभागाने हाय अलर्ट जारी केला आहे. तर १६ ऑगस्टला मात्र विदर्भातील स्थिती सामान्य असणार आहे. मात्र, १५ ऑगस्टला कोकणातील रत्नागिरीत तर पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यात मुसळधार पाऊस असणार आहे. १६ ऑगस्टला पून्हा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे साताऱ्यात तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावतीत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.