बुलढाणा : जुन्या वैमनस्यातून एका इसमाची चाकूने सपासप वार करुन हत्या करण्यात आली. खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द शिवारातील शिवाजी अंभोरे यांच्या शेताजवळ काल शनिवारी रात्री हा खळबळ जनक घटनाक्रम घडला. प्रकरणी आज रविवारी, २० एप्रिल रोजी उत्तररात्री तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. चालू एप्रिल महिन्यातील ही हत्येची चौथी घटना असून यामुळे खामगाव तालुक्यासह बुलढाणा जिल्हा हादरला आहे. ईश्वर बाबाराव तायडे ( लासुरा जहागीर, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
भारत झामू यादव( वय ४५ वर्षे, राहणार लासुरा जहागीर, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा) असे आरोपी मारेकऱ्याचे नाव आहे. ईश्वर तायडे हा काल शनिवारी रात्री,आपले पिता बाबाराव भिवाजी तायडे ( वय ६५ वर्षे, राहणार लासुरा जहागीर, तालुका खामगाव) यांना शेतात जेवणाचा डबा देऊन मोटार सायकलने घरी जात होता. दरम्यान पळशी खुर्द शिवार जवळ भारत यादव याने त्याला अडविले. तसेच्या जुन्या दुश्मनीवरून वाद घातला. एवढ्यावरच न थांबता चाकूने सपासप वार करुन ईश्वर ला गंभीर जखमी केले. गंभीर घाव आणि रक्तस्त्राव मुळे ईश्वरचा मृत्यू ओढवला.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार व पोलीस कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी भारत यादव याला ताब्यात घेतले. त्याला खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आले. काल शनिवारी रात्री तीन वाजताच्या सुमारास आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मृतकचे पिता बाबाराव तायडे यांनी फिर्याद दिली.
आरोपी भारत व ईश्वर मध्ये दोन ते तीन वर्षांपूर्वी वैमनस्य निर्माण झाले होते. त्यातूनच या थरारक हत्येचा उगम झाला, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. आरोपी भारत यादव याच्यावर यापूर्वीही ३५४ चा गुन्हा दाखल असून, तो पोलिसांच्या रडारवर होता. घटनास्थळी केवळ दहा मिनिटांतच पोलीस फौजफाटा दाखल झाला. पोलिसांच्या तत्परतेने आरोपीला अटक करण्यात आली असून पूर्व वैमनस्यातून झालेल्या या हत्येने तालुक्यात चांगलीच खळबळ उडवून दिली.