लोकसत्ता टीम

वर्धा : मुलांना चांगले वळण लावण्याचा प्रयत्न आईवडील नेहमीच करतात. त्यात जर वडील नसतील तर मुलांकडे आई अधिकच माया लावून लक्ष ठेवते. मात्र चुकीच्या गोष्टीसाठी हटकले म्हणून मुलाने आईचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना उजेडात आली आहे.

आर्वी तालुक्यातील खरंगणा हद्दीत असलेल्या काचनूर गावात ही घटना घडली आहे. सोपान मुरलीधर पुसदकर असे आरोपी मुलाचे नाव असून मृत आई मीरा मुरलीधर पुसदकर आहे. आरोपीस वडील नसून दोन बहिणींचे लग्न झाल्यानंतर आई व मुलगा दोघे सोबतच राहायचे. मुलाचे गावातीलच एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. आई त्यास विरोध करायची. त्यातूनच घटनेच्या दिवशी रात्री वाद झाला. वाद विकोपास गेल्यावर मुलाने रागाच्या भरात बाजूलाच असलेल्या पाटा वारवंट्यातील वरवंटा उचलून आईच्या डोक्यात हाणला. त्यात आईचा जागीच मृत्यू झाला.

आणखी वाचा-दोन खुनांच्या घटनांनी यवतमाळ जिल्हा हादरला; आर्णीत जावयाकडून सासऱ्याची हत्या, पांढरकवडात तरुणाला संपविले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस पाटील उमेश अंभोरे यांनी खरंगना पोलीसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर ठाणेदार सदाशिव ढाकणे गावात पोहचले. तसेच वरिष्ठ अधिकारी खंडेराव व वृष्टी जैन यांनी भेट देत तपासास दिशा दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद सानप तसेच धीरज मिसाळ, विठ्ठल केंद्रे, मनीष वैद्य, श्यामराव इवनाथे, वसंता पिसे, अमोल इंगोले, प्रतिभा पेंदाम, योगेश्री उके यांची चमू तपास करीत आहे. श्वानपथक तसेच ठसे तज्ञ यांची मदत घेऊन पुढील तपास सुरू आहे.