वाशिम : एका खाजगी दस्तलेखकावर चाकू हल्ला झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कारंजा तहसील कार्यालय परिसरात १ मार्च रोजी दुपारी दोन वाजेदरम्यान घडली. हरिश्चंद्र विलास मेश्राम वय ३८ वर्ष असे मृत्यू पावलेल्या दस्त लेखकाचे नाव असून तो कारंजा तालुक्यातील मेहा येथील रहिवासी होता.

प्राप्त माहितीनुसार, आज दुपारी दस्तलेखक आपले काम करीत असताना अचानक एका अज्ञात इसमाने येऊन त्याच्या मानेवर चाकूने वार केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच त्याला कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा…बिल गेट्सची भारतात टपरीवर चहा पिण्याची ‘इनसाईड स्टोरी’, नागपूरच्या डॉलीने आधी दिला होता नकार…

परंतु तपासणी दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. वृत्त लिहिपर्यंत या संदर्भात पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली नव्हती. चाकू हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाल्याची माहिती आहे.