नागपूर : गोंदिया जिल्ह्यातील धाबेपवनी येथील अरण्यपुत्र माधवराव पाटील आणि अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्यात अतिशय घट्ट असे नाते विणले गेले होते. नात्यांचा हा बंध इतका घट्ट होता की माधवरावांच्या मृत्यूनंतर चितमपल्ली म्हणाले, माझ्याही मृत्यूनंतर माझ्या अस्थी त्यांच्या शेजारीच दफन करण्यात याव्या.

सहाय्यक वनसंरक्षक म्हणून नवेगाव बांध येथे वनखात्यात मारुती चितमपल्ली रुजू झाले. १९७५ च्या तो काळ होता आणि नवेगाव बांध येथे पाऊल टाकल्यानंतर त्यांची निसर्गाचा दांडगा अभ्यास असणा-या माधवराव पाटील डोंगरवार यांच्याशी ओळख झाली. कारण त्यांचा मुक्काम हा त्यावेळी माधवराव पाटलांकडेच होता. माधवराव पाटील हे कधीकाळी शिकारी होते, पण नंतर त्यांचे मन पालटले आणि निसर्गसंवर्धक माधवराव पाटील जन्माला आले. त्यामुळे सेवेत असेपर्यंत मारुती चितमपल्ली यांचा मुक्काम माधवराव पाटील यांच्याकडे होता आणि त्यानंतर कधी ते त्यांच्या कुटुंबातील सदस्य झाले, हे कळले नाही.

चितमपल्ली यांनी जंगल आणि वन्यजीवांचे  बारकावे आणि निसर्गनिरीक्षणाच्या पद्धती माधवराव पाटील यांच्याकडून समजून घेतल्या आणि तेथून त्यांच्यात गुरुशिष्यांचे नाते तयार झाले. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धाबेपवनी येथे माधवराव पाटलांचा वाडा आहे. चितमपल्ली पाटलांसोबत जंगलात भटकंती करायचे आणि त्यांच्यात तासनतास चर्चा व्हायच्या.

अंजनाच्या झाडाखाली पाणी लागते हा आदिवासींमध्ये पूर्वापार समज आहे. त्याची प्रचिती घेण्यसाठी माधवराव पाटील यांनी वनखात्याचे अडथळे सांभाळून एक-दीड महिना खोदकाम केले आणि खरेच पाणी लागले. त्याआधी वनाधिकारी चितमपल्ली यांनी एक लाख ३२ हजार रूपयांची योजना वनप्राण्यांसाठी पाणी मिळावे म्हणून तयार केली होती. माधवरावांनी परंपरागत ज्ञानाचा अवलंब केला आणि बांबूच्या मदतीने पाणी टाक्यांपर्यंत पोहोचले. या प्रकल्पाला माधवझरी नाव देण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२००६ मध्ये माधवरावांचे निधन झाले. माधवझरी परिसरात त्यांचा दफनविधी झाला. माधवरावांचा अंत्यविधी जिये पार पडला त्याच्या बाजूला माझ्या मृत्यूनंतर माझ्याही अस्थी पुरण्यात याव्यात, ही होती त्यांची इच्छा. माधवरावांच्या निधनानंतर चितमपल्ली अस्वस्थ झाले आणि त्यांनी धाबेपवनीलाच राहण्याचा निर्णय घेतला. ते पाटील वाड्याशेजारीच राहात होते. त्याठिकाणी त्यांच्यासाठी कुटी उभारण्यात आली होती. पण, नंतर प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना धाबेपवणी सोडावे लागले आणि नागपुरात यावे लागले.