गांधीसागरमध्ये आढळलेल्या मृतदेहांची ओळख पटली

नागपूर : गांधीसागर तलाव परिसरात सोमवारी महिलेसह एक वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह सापडला होता. त्यांची ओळख पटली असून त्या वर्धा जिल्ह्य़ातील सिंधी मेघे येथील रहिवासी होते. मृत महिलेने कौटुंबिक कलहातून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

सायली नितीन खावळे (२२) आणि माहेश्वरी नितीन खावळे (१० महिने) दोन्ही रा. धांडे लेआऊ ट, सिंदी मेघे अशी मृत मायलेकींची नावे आहेत. दोन वर्षांपूर्वी सायलीचा नितीन खावळेसोबत विवाह झाला होता. नितीन हा वाहनचालक आहे. लग्नानंतर काही दिवस चांगले गेल्यानंतर त्यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद होऊ  लागला. दहा महिन्यांपूर्वी त्यांना मुलगी झाली. त्या वादात आणखी भर पडली. कौटुंबिक कलहामुळे सायली त्रस्त झाली आणि तिने आत्महत्येचा निर्णय घेतला. २० जून रोजी घरी कुणालाही काही न सांगता ती मुलीसह बेपत्ता झाली. दोन दिवस वाट पाहूनही ती न आल्याने शेवटी सावंगी मेघे पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली. सिंदी मेघे पोलीस तिचा शोध घेत असतानाच सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास गांधीसागरात दोघींचेही मृतदेह तरंगताना दिसले. काठावर फक्त सायलीच्या चपला होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओळख पटण्याजोगे त्यांच्याजवळ काहीच नव्हते. शेवटी वर्धा ते नागपूर रेल्वे तिकीट आढळल्याने गणेशपेठ पोलीसांनी वर्धा पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर सायलीचा पती नितीन, सासू उषा आणि तिचे आईवडील वर्धा पोलिसांसोबत नागपूरला आले. परंतु, शवागार बंद असल्याने आज मंगळवारी सकाळी दोघींचेही मृतदेह त्यांना दाखवले असता सायलीच्या नातेवाईकांनी त्यांची ओळख पटवली. शवविच्छेदन झाल्यानंतर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.