नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकेकाळी अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमचा हस्तक म्हणून सुधाकर बडगुजर यांच्यावर आरोप केला होता. तेव्हा बडगुजर उद्धव ठाकरे यांच्या पक्षात होते. आता याच बडगुजरांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशावरून नाशिक भाजपमध्ये दोन गट तयार झाले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी बडगुजर कोण? असा प्रश्न उपस्थित केला.

सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे ते उद्धव ठाकरेंच्या पक्षात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुख्यात दाऊदचा हस्तक म्हणून त्यांच्यावर आरोप केला होता. आता त्यांच्या प्रवेशावरून नाशिक भाजपात दोन गट पडले आहेत. यावर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना विचारणा केली असता, ”कोण बडगुजर, मला काही माहीत, मी त्याचा चेहराही बघितला नाही.” असे सांगून त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला.

भा. ज. प. महानगरतर्फे नागपुरातील सुरेश भट सभागृहात डॉ. उदय निरगुळकर यांनी नितीन गडकरी यांची मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळातील कामाबाबत प्रकट मुलाखत घेतली. याप्रसंगी डॉ. निरगुळकरांनी गडकरी यांना नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुधाकर बडगुजर यांच्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर नितीन गडकरी पुढे म्हणाले, आपण बडगुजरला ओळखत नाही आणि त्याच्या पक्ष प्रवेशाशी माझा काही संबंध नाही. त्यानंतर त्यांनी मात्र बडगुजरवर बोलणे टाळले. गडकरी पुढे म्हणाले, ज्या देशात ५१ टक्के मुस्लिम समाज आहे आणि ज्या देशाने मुस्लिम राष्ट्र घोषित केले त्या देशात लोकशाही, समाजवाद शिल्लक राहिला नाही. भारताने सर्वाधिक संख्या असतानाही हिंदू राष्ट्र घोषित केले नाही. आपल्या देशाचे संविधान आहे आणि संविधानावरच देश सुरू आहे. भारताचा इतिहास बघा किंवा रामायण, महाभारत ग्रंथ बघा. कोणी कोणाच्या धर्माच्या विरोधात नसल्याचे त्यात दिसून येईल. भारतीय, हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व एकाच नाण्याची बाजू असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजप काळात हा झाला विकास…

‘१९४७ मध्ये देशाला स्वातंत्रानंतर अनेक वर्षे काँग्रेसची सत्ता होती. पण काँग्रेसच्या धोरणांचे काय परिणाम झाले, हे देशाने बघितले. दरम्यान, अटलजींच्या नेतृत्वातील सरकारने अनेक कामे केलीत. २०१४ मध्ये सरकार आल्यानंतर एनडीएने अकरा वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कामे केली. या काळात ‘विमानतळांची संख्या दुप्पट झाली, रेल्वे, महामार्ग, टनेल्स, पर्यटन, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, सेवा प्रत्येक क्षेत्रात विकास झाला. २५ कोटी लोक गरिबीरेषेच्या वर आले. उज्ज्वला योजनेत ११ कोटी घरांमध्ये सिलींडर दिले. आयुष्यमान योजना, कृषी सिंचन योजना, उद्योग आदींच्या माध्यमातून भारताच्या विकासाला नवी दिशा मिळाली आणि भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला,’ असे ते म्हणाले.