नेहमी काँग्रेसच्या मागे उभा राहणारा विदर्भ हा इतिहास पुसून टाकण्याच्या पातकात सहभागी झाल्याबद्दल या पक्षाच्या तमाम नेत्यांचे अभिनंदन करायला हवे. ज्या काळात हे वृद्ध नेते तरुण होते, त्याच काळात हा प्रदेश काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभा ठाकला. आता जिल्ह्य़ा-जिल्ह्य़ात असलेले व उतरणीला लागलेले हे नेते स्वत:च्या कर्तृत्वानेच हा इतिहास पुसायला हातभार लावत असल्याचे दृश्य गेल्या अडीच वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत दिसू लागले आहे. ताजा पराभव, हे त्याचेच उदाहरण आहे. लोकशाहीची वाटचाल समृद्धपणे व्हायची असेल, तर सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकही सक्षम असायला हवेत. काँग्रेसमधील वृद्ध, पण पदाची लालसा अजूनही मनात कायम ठेवणारे हे नेते सक्षम विरोधक सुद्धा निर्माण होऊ देत नाहीत, हे या ताज्या निकालावरून दिसून आले.
ज्या काळात विदर्भात भाजप व जनसंघाचे नावही नव्हते व या पक्षाला जनाधार मिळावा म्हणून जे मोजके लोक झटत होते त्या काळात उदयाला आलेले काँग्रेसचे नेते अजूनही राजकारणात सक्रिय राहू पाहतात, तर दुसरीकडे जनाधारासाठी झटणारी भाजप व जनसंघातील नेत्यांची पिढी केव्हाच राजकीय पटलावरून गायब झाली. त्यांची जागा नव्या दमाच्या नेत्यांनी घेतली व त्यांचीच मोहिनी सध्या जनतेवर पडलेली दिसत आहे. पक्षाचे दिवस खराब आहे, असे म्हणत पराभवाचे खापर मतदारांच्या मानसिकतेवर फोडणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी हा बदल लक्षात घ्यायला हवा, पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. पराभव धडा शिकवणारा असतो व त्यातून बोधही घ्यायचा असतो, अशी वाक्ये फेकणारी ही नेतेमंडळी स्वत:ला वगळून आत्मपरीक्षण करत असतात. स्वत:चे काय चुकले, या प्रश्नाचा शोध घेण्यापेक्षा आता मोदींची हवा आहे, काँग्रेसवरचा लोकांचा विश्वास सध्या उडाला आहे, त्याला आम्ही काय करणार?, असे फालतू प्रश्न हे नेते उपस्थित करत असतात. सत्ताधारी काही देव नसतो. तोही हाडामांसाचा माणूस असतो व त्याच्याकडूनही चुका होतच असतात. त्या चुका लोकांना दाखवत विरोधक म्हणून आणखी मेहनत करण्याची तयारी या नेत्यांची नसते. त्यामुळे त्यांचे असे बरळणे सुरू राहते. वास्तवापासून दूर पळणाऱ्या या नेत्यांच्या मदतीला इव्हीएम हमखास येतात. त्यात घोळ झाला म्हटले की, स्वत:चे अपयश सहज झाकता येते. सध्या काँग्रेसच्या मदतीला या मशीन धावून आल्या आहेत. जेव्हा भाजप पराभूत व्हायचा तेव्हाही या न बोलणाऱ्या मशीन त्यांच्या उपयोगी पडायच्या. अपयश लपवण्यासाठी निर्जीव वस्तू शोधण्याचा हा पायंडा राजकीय पटलावर अलीकडेच रूढ झाला आहे व त्याला चांगली लोकप्रियता लाभत आहे. किमान काँग्रेसच्या बाबतीत तरी आताचा खरा प्रश्न वास्तवाला कोण भिडेल हा आहे व त्या प्रश्नापासून सारेच दूर पळत असल्याचे चित्र विदर्भात ठिकठिकाणी दिसत आहे.
येथे कुणाचेही नाव घेण्याची गरज नाही, पण प्रत्येक जिल्हा व त्यातील काँग्रेसच्या नेत्यांची नावे आठवून बघा. त्यांची थकलेली शरीरे नजरेसमोर आणा. सत्ता, साधन व संपत्ती भोगून झाल्यावर सुद्धा हे नेते निवडणुकीच्या काळात सक्रिय असल्याचे दाखवतात. पुन्हा पराभव झाला की, दरबारी राजकारणात मग्न होऊन जातात. आता आपण थांबायला हवे, असे यांना अजिबात वाटत नाही. नव्या नेतृत्वाच्या उदयाच्या गोष्टी हे नेते करतात, पण हे नेतृत्व त्यांना ऐकणारे, किमानपक्षी घरातीलच हवे, असा त्यांचा आग्रह असतो. या नेत्यांचा जनतेतील करिष्मा केव्हाच ओसरलेला असतो. त्यामुळे त्यांनी समोर आणलेले नेतृत्वही जनता नाकारते, तरीही या नेत्यांची हौस फिटत नाही. पक्षासाठी किती खस्ता खाल्ल्या, या बाबा आदमच्या जमान्यातील गोष्टी ते दरबारात हजेरी लावणाऱ्यांना ऐकवत राहतात व स्वप्नरंजनात गढून जातात. राजकारणाचा पूर्ण पोतच बदललेला आहे, हे त्यांच्या गावीही नसते. ही नेतेमंडळी निवृत्तीची भाषा करतात, पण प्रत्यक्षात ती अंमलात आणत नाही. मृत्यूच निवृत्त करू शकतो, या तत्त्वावर या नेत्यांचा ठाम विश्वास असतो. राजकारणात कशाला हवी निवृत्ती?, असा प्रश्न ते रोज सकाळी उठून स्वत:च्या मनाला विचारत असतात आणि पक्षाला हातभार लावण्याचे निमित्त साधत तो खड्डय़ात कसा जाईल, याचा चोख बंदोबस्त करत असतात. मी असेपर्यंत मीच, माझ्यानंतर कुणीच नाही, या विचारावर या नेत्यांची ठाम श्रद्धा असावी, असे दिसते. आता सत्तेत असलेल्या भाजपने निवृत्तीचे वय निश्चित करण्याचे धाडस केले. सामान्य जनतेला सुखावणारा हा निर्णय होता. तसे धाडस काँग्रेस कधीच दाखवू शकणार नाही, हे या कुठे सत्तरी, तर कुठे साठी पार केलेल्या नेत्यांना पक्केठाऊक आहे. त्यामुळेच पक्षाची सेवा करतो, असे सांगत पक्षाला पराभवाच्या मानसिकतेत नेण्याचे काम सध्या या नेत्यांकडून इमानेइतबारे सुरू आहे. कोणत्याही व्यक्तीच्या कामाचे वलय समाजात काही काळ टिकते. ठराविक कालखंड ओसरला की, हे वलय हळूहळू नष्ट होत जाते. असे वलय नष्ट झालेल्या नेत्यांची संख्या काँग्रेस पक्षात भरपूर आहे. विदर्भात तर याच नेत्यांचा भरणा जास्त आहे. त्यामुळे हा पक्ष जबाबदार विरोधक होण्याच्या लायकीचा सुद्धा राहिलेला नाही, हे अलीकडच्या काही वर्षांतील वास्तव आहे.
आता जिल्हावार दिसणारी ही वृद्ध नेतेमंडळी पराभवातून बोध घ्यावा लागेल, पक्षाला चिंतन करावे लागेल, या पराभवाला अमूक दोषी, तमुकामुळे पक्ष हरला, अशी मोठमोठी विधाने फेकू लागली आहेत. ही सारी विधाने अपयश झाकण्यासाठी व स्वत:चे दोष लपवण्यासाठी केली जातात, हे जनतेला कळून चुकले आहे. अशी विधाने करणारे नेते आता मीच राजकारणातून बाजूला होतो, असे म्हणण्याचा बाणेदारपणा कधीच दाखवत नाही. कारण, पक्ष हाच यांच्या कृत्य अथवा गैरकृत्यावर पांघरून घालण्यासाठी आधार ठरणारी एकमेव गोष्ट ठरत आला आहे. त्यासाठीच यांना पक्षाचे कवच हवे असते. राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या नव्या तरुणांना नेत्यांचा हा बनावटीपणा कळत असतो. म्हणूनच हे तरुण जेथे संधी मिळण्याची शक्यता आहे, तिकडे धाव घेतात. काँग्रेसमध्ये जाण्याची हिंमत फारच थोडे करतात. जे जातात ते काही काळ सक्रिय राहिल्यावर नेत्यांच्या या दिखाऊ वागण्याला व सत्तालोलुपतेला कंटाळतात. या नेत्यांना रिटायर करा, अशी मागणी करतात व ती पूर्ण होत नाही, हे लक्षात आले की, दुसऱ्या पक्षाची वाट धरतात. विदर्भातील काँग्रेसचे हे वास्तव आहे व अजूनही ते कुणी उघडपणे मान्य करायला तयार नाही, हे दुर्दैव आहे.
devendra.gawande@expressindia.com