नागपूर : उत्तम प्रशासनाच्या मानकामध्ये गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक यांची कर्तव्य तत्परता ही अत्यंत महत्वाची असते. पाणंद रस्ते, फेरफार, पिककर्ज, संजय गांधी निराधार योजना व इतर निवडक योजना या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या आहेत. या योजनांची अंमलबजावणी अधिक पारदर्शक व तत्पर झाल्यास नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

जिल्ह्यातील मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेस अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रविण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, जिल्हा परिषद व महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना पिककर्ज वेळेत मिळाले पाहिजे यासाठी शासन दक्ष आहे. ॲग्रीस्टॅक ही योजना पारदर्शकतेसाठी महत्वाची आहे. पाणंद रस्ते याबाबत वर्षोनिवर्ष सुरु असलेले वाद सामोपचाराने तत्काळ मार्गी निघू शकतात. गावातील पाणंद रस्त्यांची माहिती प्रत्येक गावात जाहीर करा असे ते म्हणाले. सर्व योजनांसाठी ग्रामीण भागात शासनाचे दूत म्हणून तलाठी व ग्रामसेवकाकडे पाहिले जाते. ही जबाबदारी अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आता प्रत्येक महिन्यात तिसरा व चौथा बुधवार जिल्ह्यातील प्रत्येक गावासाठी समाधान दिवस म्हणून राबविण्यात येईल. या दिवशी प्रत्येक गावांसाठी असलेल्या साजाच्या ठिकाणी तलाठी, ग्रामसेवक व गावपातळीवरील शासकीय कर्मचारी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या तक्रारीचे समाधान करतील. याचबरोबर जे शक्य होणारी कामे आहेत ती तत्काळ मार्गी लावतील, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शासनातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या कर्तव्याप्रती गंभीर असलेच पाहिजे. तलाठी ग्रामसेवक यांच्या गावपातळीवर उपस्थितीबाबत लवकरच एक परिपत्रक निर्गमित करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. प्रधानमंत्री धरती आबा योजना, वनपट्टे यासारख्या आदिवासी विभागाच्या योजनांना अधिक गती देण्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेत समाधान दिवस, पाणंद रस्ते, अतिक्रमण मुक्त करणे, फेरफार अदालत व जीवंत सातबारा मोहीम, ॲग्रीस्टॅक, पिककर्ज याबाबत उपस्थित तलाठी यांना मार्गदर्शन करण्यात आले. तहसीलदार कल्याणकुमार डहाट, सचिन कुमावत, राजू रणवीर यांनी हे मार्गदर्शन केले.