नागपूर: नागपूरसह राज्यभरात स्मार्ट प्रीपेड मीटरला सर्वसामान्यांकडून कडाडून विरोध होत आहे. त्यातच मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह शहर असलेल्या नागपुरातून स्मार्ट प्रीपेड मीटरबाबत मोठी बातमी पुढे येत आहे. नागपुरात शुक्रवारी (१ ऑगस्ट २०२५ रोजी) संध्याकाळी स्मार्ट मीटर विरोधात आंदोलकांनी थेट मशालच पेटवल्या. त्यानंतर काय झाले? त्याबाबत आपण जाणून घेऊ या.

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी नागपूरमध्ये स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन करण्यात आले. आंदोलक मध्य नागपुरातील गोळीबार चौकात एकत्र आले. येथे सगळ्यांनी मशाली पेटवून गांधीबाग उद्यानाकडे कूच केले.

दरम्यान विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुरकर म्हणाले, स्मार्ट प्रीपेड वीज मीटरला वीज ग्राहकांसोबतच विदर्भ राज्य आंदोलन समितीचा सतत्याने विरोध आहे. त्यानंतरही नागपूर शहर सह संपूर्ण विदर्भात टीओडी मीटर च्या नावाखाली गुपचूप स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचा उपक्रम महावितरणद्वारे सुरू आहे. हे मीटर लावण्याचा परक्रम फक्त उद्योगपतींना फायदा पोहचवण्यासाठी आहे. यात वीज ग्राहकाची पिळवणूक होणार आहे.

नागपूरसह राज्यात हे प्रीपेड वीज मीटर लागले तेथे वीज ग्राहकांना सामान्य पेक्षा ४ ते ५ पटीने जास्त वीज देयक येत आहे. त्यामुळे वीज देयकातून होणाऱ्या लुटीमुळे ग्राहक संतापले आहे. मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडण‌वीस यांच्या आश्वासनानुसार स्मार्ट प्रीपेड मीटर वीजग्राहकांनी लावल्यास त्यांना दिवसाला प्रति युनिट ८५ पैसे बील कमी येणार. परंतु ही फक्त फसवी घोषणाच आहे.

तसेच वीज दरवाढ २३ टक्यांनी कमी करणार असल्याचेही आश्वसन पुढील पाच वर्षात होणार आहे. त्यामुळे आजपर्यंत झालेली अवास्तव वीज दरवाढ सरसकट व तात्काळ कमी करण्यात यावी तसेच स्मार्ट प्रीपेड मीटर कुठेच लाऊ नये, याविरोधात हे आंदोलन आहे.

दरम्यान मशाल मोर्चा गांधीबाग उद्यानाजवळ आल्यावर आंदोलकांनी सरकारसह महावितरणच्या विरोधात स्मार्ट मीटरबाबत संताप व्यक्त केला. तातडीने हे मीटर रद्द करण्यासह स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणीही यावेळी केली गेली. आंदोलनात पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार, सुनील चोखारे, नरेश निमजे, नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रशांत नखाते, नागपूर शहर महिला अध्यक्षा ज्योतीताई खांडेकर, नागपूर शहर राजेंद्र सतई, नागपूर शहर युवा आघाडी अध्यक्ष गिरीश तितरमारे, व्यापारी आघाडी अध्यक्ष रवींद्र भामोडे, गणेश शर्मा, अनिल केशरवानी उपस्थित होते.