नागपूर : अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पांव्यतिरिक्त लगतच्या कॉरिडॉरमध्ये वन्यजीवांचा अधिवास असल्याचे आजवर अनेकदा सिद्ध झाले आहे. किंबहुना, या कॉरिडारमधील वन्यजीव आवाज, प्रदूषण यासारख्या बाबींना सरावलेले आहेत. मात्र, त्यांना तेथून हुसकाण्याचा घाट उद्योजकांनी घातला असून त्यासाठी दिवसरात्र कारखाना आणि वन्यजीव अधिवासाच्या सीमेवर स्फोट घडवून आणले गेले.
राज्य सरकारनेही उद्योजकांचीच बाजू उचलून धरत वन्यजीवांचा अधिवास उद्योजकांच्या घशात घातला. त्यामुळे वाघांचा अधिवासही हिरावला गेला आणि वन्यजीवांचा रस्ताही खंडित झाला. कळमेश्वर मार्गावरील खैरी-निमजीच्या जंगलालगत असलेल्या ‘सोलार एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी’ने दहा वर्षांपूर्वी राज्य सरकारला वनखात्याची ८८ हेक्टर जमिनीची मागणी केली होती. याठिकाणी वाघासह इतरही वन्यजीवांचा अधिवास असल्याने वन्यजीवप्रेमींनी या मागणीला प्रचंड विरोध केला. त्यानंतरही राज्य सरकारने ८४ हेक्टर जमीन या कारखान्याला दिली.
मात्र, यामुळे पेंच व्याघ्रप्रकल्प आणि बोर व्याघ्रप्रकल्पादरम्यानचा कॉरिडॉर खंडित झाला आहे. खैरी-निमजीच्या या जंगलात वाघांसह इतरही वन्यजीवांचे अस्तित्व आहे. याच परिसरात ‘सोलार एक्स्पलोझिव्ह फॅक्टरी’ आहे. त्याच्या विस्तारासाठी ८८ हेक्टर जागेची मागणी वनखात्याकडे करण्यात आली होती. त्या मोबदल्यात काही कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव देखील या कारखान्याच्या मालकाने समोर केला.
त्यावेळी वनखात्याने एक सहाय्यक वनसंरक्षक, दोन वनपरिक्षेत्र अधिकारी व जिल्ह्याच्या दोन्ही मानद वन्यजीव रक्षकांचा सहभाग असणारी समिती गठित केली. या समितीने कॅमेरा ट्रॅप लावून परिसराचे सर्वेक्षण केले आणि या ठिकाणी वाघ, बिबट्यासह इतरही वन्यजीवांचे अस्तित्व असल्याचा अहवाल उपवनसंरक्षकांना सादर केला. मात्र, या वनक्षेत्रातील कक्ष क्र. ३१ मधील जमीन कारखाना मालकाला हवी होती आणि या कक्षात वाघाचे अस्तित्व होते.
तत्कालीन उपवनसंरक्षकांनी समितीच्या अहवालातून हा मुद्दा खोडून अहवाल प्रधान मुख्य वनसंरक्षकांना पाठवला आणि त्यांनी तो शासनाकडे पाठवला. त्यावेळी आमदार आशीष देशमुखांसह अनेक वन्यजीवप्रेमींनी त्यावर आक्षेप घेतल्यामुळे शासनाने पुन्हा नव्याने पत्र काढून या परिसरातील सर्वेक्षणाचे आदेश दिले. त्यासाठी नव्याने समिती गठित करण्यात आली. यापूर्वीच्या सर्वेक्षणात लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपपेक्षाही दुपटीने कॅमेरा ट्रॅप कक्ष क्र. ३१ मध्ये लावण्यात आले. मात्र, कारखाना मालकाला ही माहिती मिळाल्यामुळे त्यांनी या कॉरिडॉरमध्ये रात्रंदिवस बारुद स्फोट केले. कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघ आणि इतर वन्यजीवांचे छायाचित्र येऊ नये म्हणून ही शक्कल लढवली.
मात्र, दुसऱ्या अहवालात देखील वाघासह इतरही वन्यप्राणी आढळले. मात्र, त्यानंतरही राज्य सरकारने तब्बल ८४ हेक्टर जमीन या कारखान्याच्या विस्तारासाठी दिली. परिणामी येथील वाघांचा कॉरिडॉर मात्र खंडित झाला.