नागपूर : सक्करदरा पुलाची लांबी जास्त असल्यामुळे शहरातून बाहेर जाणारी वाहने अतिवेगाने पुलावरून धावतात. त्यामुळे या पुलावर आतापर्यंत बरेच अपघात घडले असून नागरिक अपघाताच्या भीतीच्या सावटाखाली असल्याचे जाणवते. विशेष म्हणजे, मागील सव्वा वर्षात येथे १३ अपघात घडले आहे.

सक्करदरा उड्डाण पुलाची सुरुवात रेशीमबाग मैदान चौकापासून होते तर पुलाचे लँडिंग भांडे प्लॉटपूर्वी आहे. अशोक चौकातून रेशीमबाग चौकामार्गे थेट सक्करदरा उड्डाणपुलावरून उमरेडकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी आहे. ग्रामीण भागातील मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचीही मोठी संख्या आहे. तसेच महाल, सीताबर्डी, कॉटन मार्केट, बुधवार बाजार अशा गजबजलेल्या बाजारपेठा असलेल्या परिसरातून भांडे प्लॉट, नंदनवन, दिघोरी आणि उमरेडकडे जाण्यासाठी सोपा मार्ग म्हणून सक्करदरा पुलाचा वापर होतो. रेशीमबाग चौकात जवळपास चार ते पाच महाविद्यालये असल्यामुळे तसेच लगतच दोन मैदाने असल्यामुळे खेळाडू आणि विद्यार्थ्यांचीही गर्दी असते. या उड्डाणपुलाची लांबी मोठी असल्यामुळे पुलावर वाहन चढताच वाहनांचा वेग वाढतो. पुलावरूनच ‘ओव्हरटेक’ करण्याचा प्रयत्न वाहनचालक करताना नेहमी दिसतात. वेगाची मर्यादा ओलांडून वाहनचालक भरधाव वाहने चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. पुलाच्या दोन्ही बाजूंना रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे पुलाच्या दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होती. पुलावर चढताना आणि उतरताना रस्त्याच्या बाजूला ऑटोचालक अगदी रस्त्याच्या कडेला प्रवासी घेतात. तसेच फेब्रीकेशन वर्कची दुकाने आणि भंगारवाल्यांनी पुलाच्या परिसरातील जागा व्यापून टाकली आहे. उड्डाणपुलावरील भरधाव वाहनांमुळे चौकात अपघात होण्याची नेहमी भीती असते.

हेही वाचा – नाना पटोलेंच्या कारला अपघात; उभ्या गाडीला भारधाव ट्रकची धडक

काही महिन्यांपूर्वीच सक्करदरा उड्डाणपुलावरून जाणाऱ्या भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मायलेकासह एका चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. यानंतर काही दिवस वाहतूक पोलीस चौकात दिसत होते. मात्र, सध्या चौकातून वाहतूक पोलीस बेपत्ता आहेत.

खासगी बसेसमुळे वाहतूक कोंडी

सक्करदरा चौकाच्या काही अंतरावर खासगी बसेस थांबण्याची जागा आहे. मोठ्या बसेस या चौकात थांबतात. एकाच वेळी दोन ते तीन बसेस उड्डाणपुलाच्या बाजूच्या रस्त्याने निघत असल्यामुळे सक्करदरा चौकापासूनच वाहतूक कोंडी निर्माण होते. मात्र, या बाबीकडे वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष केले जाते. नागरिकांना मात्र खासगी बसेसचा नेहमीचाच त्रास सहन करावा लागत आहे.

पुलावरून धोकादायक ‘यू-टर्न’

सक्करदरा उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंनी मोठमोठे दुभाजक असल्यामुळे रस्ता ओलांडण्यासाठी जवळपास तीन ते चार किमींचा फेरा घ्यावा लागतो. तो फेरा वाचवण्यासाठी दुचाकी, चारचाकी चालक पुलावर चढल्यानंतर काही अंतरावरून ‘यू टर्न’ घेतात. हा प्रकार अपघातास कारणीभूत असून अनेकदा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा जीव थोडक्यात वाचल्याच्या घटना घडल्या आहे.

हेही वाचा – “विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का?”, नाना पटोलेंच्या अपघातावरून काँग्रेसचा सवाल

सक्करदरा पुलावरून जाताना ‘ओव्हरटेक’ करणाऱ्या वाहनांची धास्ती मनात असते. पुलावरून रेशीमबाग चौकाकडे उतरताना वाहनांचा वेग जास्त असतो. त्यामुळे तुटलेल्या दुभाजकाला ओलांडून येणारे ऑटो, कार, दुचाकीला धडकण्याची भीती नेहमी असते. – प्रणाली पिंपळकर (विद्यार्थिनी)

उड्डाणपुलावरून वेगात जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. उड्डाणपुलावर अपघात होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्या असून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुलाच्या दोन्ही चौकात वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहे. – भारत कऱ्हाडे (पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग)