नागपूर: जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणीक्रमांकाची पाटी लावणे बंधनकारक आहे. त्यासाठी शासनाने जीएसटी वगळून दुचाकीसाठी ४५० रुपये निश्चित केले असतांनाच काही केंद्र चालक अवास्तव शुल्क घेऊन नागरिकांची लुट करत आहे. ग्राहकांच्या तक्रारीवरून शासनाने नागपुरातील एका केंद्राला नोटीस बजावत काम थांबवले आहे. त्यामुळे नागपुरातील या पाटी लावणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची पाटी ३० जून २०२५ पर्यंत बसवणे बंधनकारक केले आहे. त्याबाबत राज्याच्या परिवहन विभागाने सर्व आरटीओ कार्यालयांना निर्देश दिले आहेत. यासाठी दुचाकी, चारचाकी, मालवाहू वाहनांसह सर्व संवर्गातील वाहननिहय जीएसटीसह शासनाने दर निश्चित करुन दिले असून या नंबरप्लेट बसविण्यासाठी ठरावीक संस्थांची निवड केली आहे.
दरम्यान नागपुरातील झेन टीव्हीएस मोबीलीटी व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड या सेंटरने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अतिरिक्त दर घेतल्याच्या तक्रारी नागपुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडे ग्राहकांकडून मिळाल्या होत्या. त्यावरून आरटीओ कार्यालयाकडून सदर सेंटरला नोटीस बजावण्यात आली असून सदर फिटमेंट सेंटरचे काम बंद करण्यात आल्याची माहिती पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी दिली आहे. शासनाने ठरवून दिलेल्या शुल्काव्यतिरिक्त कोणी अतिरिक्त शुल्काची मागणी केल्यास त्याची तातीडने आरटीओ कार्यालयाकडे तक्रार द्यावी, संबंधितावर कडक कारवाई केली जाणार असल्याचेही राऊत यांनी लोकसत्ताशी बोलतांना सांगितले.
उच्च सुरक्षा नोंदणीक्रमांकाची पाटीचा उद्देश काय?
एचएसआरपी ही एक उच्च-सुरक्षा नोंदणी प्लेट आहे जी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सेट केलेल्या वैशिष्ट्यांचे पालन करते. एचएसआरपी प्लेटला एक अद्वितीय नोंदणी क्रमांक आहे आणि ती छेडछाड-पुरावा, चोरी-प्रतिरोधक आणि टिकाऊ म्हणून डिझाइन केलेली आहे. उच्च सुरक्षा नोंदणीक्रमांकाची पाटी ही वाहनांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहन ओळखीशी संबंधित गुन्ह्यांना रोखण्यासाठी डिझाइन केलेली एक विशेष नंबर प्लेट आहे. त्यात ओळख क्रमांक आणि क्रोमियम होलोग्राम आणि त्याच्या सत्यतेसाठी वाहन नोंदणी माहिती यासारख्या अद्वितीय सुरक्षा वैशिष्ट्यांसह येते.
नवीन नंबर प्लेटचे नियम काय आहेत?
या नंबरप्लेट 1एप्रिलपूर्वी बसवण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र आता ही मुदत वाढवण्यात आली असून आता ३० जून २०२५ पर्यंत वाहनांना नवीन नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मुदतीच्या आत नंबर प्लेट बसवली नाही, तर मोटर वाहन कायदा १९८८ नुसार दंड आकारला जाईल, असं परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे.