नागपूर : एकीकडे देशातील लाखो तरुण रोजगाराच्या शोधात आहेत, लाखो लोक अतिशय कमी पगारात नोकरी करत आहेत, अशात नागपूरच्या एका विद्यार्थ्याने तब्बल ६९ लाख रुपयांचे पॅकेज प्राप्त करत लक्ष वेधले आहे. नागपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) मधील विद्यार्थ्याने आतापर्यंतचे सर्वाधिक पॅकेज प्राप्त केले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) नागपूरचा ९वा वार्षिक पदवीप्रदान समारंभ रविवारी पार पडला. यंदा एकूण ३२९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये २६७ विद्यार्थी फ्लॅगशिप एमबीए प्रोग्रामचे, ६२ विद्यार्थी नागपूर व पुणेच्या एक्झिक्युटिव्ह एमबीए प्रोग्रामचे, तर १० विद्यार्थी आंतरराष्ट्रीय ड्युअल डिग्री प्रोग्रामचे होते. यात ६९ लाखाचे पॅकेज प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्याचाही समावेश होता.
१०० टक्के प्लेसमेंट
या पदवीप्रदान समारंभात शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी स्वाती सिंग हिला, तर फ्लॅगशिप एमबीए प्रोग्राममध्ये सर्वांगीण उत्कृष्टतेसाठी अनंत जैन याला सुवर्ण पदक देण्यात आले. पुणे बॅचमधून दुष्यंत जैन आणि नागपूर बॅचमधून विराज वोडितेल यांना एक्झिक्युटिव्ह एमबीए प्रोग्राममध्ये शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. समारंभात इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक पुनीत छटवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष सी. पी. गुरनानी, बोर्ड सदस्य, आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराय मैत्री मंचावर होते. आपल्या प्रेरणादायी भाषणात पुनीत छटवाल यांनी विद्यार्थ्यांना उद्दिष्टपूर्ण नेतृत्व करण्याचे आवाहन केले.
ते म्हणाले, ‘जर तुम्ही उद्दिष्टाचे पालन करता, तर यश हे केवळ एक परिणाम असेल. दृष्टिकोन आणि हेतू नसलेली मेहनत फार काळ टिकत नाही. आता तुमच्यासाठी नेतृत्व करण्याची, नवीन मापदंड स्थापित करण्याची आणि प्रगतीशील मानसिकता स्वीकारण्याची वेळ आहे.’ यावेळी सी. पी. गुरनानी म्हणाले, ‘यश त्यांनाच मिळते जे अपयशाला घाबरत नाहीत, सतत शिकतात, नवकल्पना करतात आणि प्रयोग करण्याचे धाडस दाखवतात. हाच बदल घडवण्याचा मार्ग आहे.
‘ डॉ. मैत्री यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत सांगितले की, गेल्या पाच वर्षांत संस्थेच्या उत्पन्नात ४०.८२ टक्के वाढ झाली असून निव्वळ मूल्यांत ४५३.८ टक्के वाढ झाली आहे. यंदा एमबीए प्रोग्रामसाठी १०० टक्के प्लेसमेंट झाले असून त्यामध्ये चार आंतरराष्ट्रीय प्लेसमेंटचाही समावेश आहे. अंतिम प्लेसमेंटसाठी यावर्षी ८९ नवीन भरती करणाऱ्या कंपन्यांनी सहभाग घेतला, तर समर इंटर्नशिपसाठी ९८ कंपन्यांनी विद्यार्थ्यांना संधी दिली. यापैकी चार विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कंपनीने पाचारण केले असून एका विद्यार्थ्याला सर्वाधिक ६९.५७ लाखाचे पॅकेज दिले गेले आहे.