नागपूर: केंद्र व राज्य शासन कुष्ठरोग निर्मुलनासाठी प्रत्येक वर्षी कोट्यावधींचा खर्च करते. परंतु आजही राज्यातील काही भागात हे रुग्ण आढळत आहे. पूर्व विदर्भात या रुग्णांची संख्या जास्तच आहे. त्यामुळे शरीरावर चट्टे असल्यास तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्याने उपचार गरजेचा आहे. नागपूर शहरातही कुष्ठरोगाचे किती रुग्ण आढळले? त्याबाबत आपण जाणून घेऊ या.,

नागपूर शहरात कुष्ठरोगाचे २२२ रुग्ण आहेत. त्यामध्ये मागील दोन महिन्यांत आढळलेल्या ३४ नवीन रुग्णांचाही समावेश आहे. नागपूर शहरासह पूर्व विदर्भात कुष्ठरोगाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. या आजाराच्या निर्मूलनासाठी रुग्णांना उपचाराच्या कक्षेत आणणे आवश्यक आहे. या आजाराची इतर आजारांप्रमाणे तीव्र लक्षणे नसल्यामुळे रुग्णालाही आपल्याला कुष्ठरोग आहे हे कळत नाही. अशात अशा रुग्णांचा शोध घेणे आव्हानात्मक ठरते. मनपाच्या आशा सेविका तसेच आरोग्य चमू या कार्यात तत्परतेने काम करत आहे.

नागपुरात कुष्ठरोगामुळे किती रुग्णांना विकृती?

नागपूर महापालिकेच्या आकडेवारीनुसार, या वर्षात नागपूर शहरात कुष्ठरोगाचे २२२ रुग्ण आढळले. यात लहान मुलांची संख्या सात असून, महिलांची संख्या ७९ आहे. १४ रुग्णांना विकृती आली आहे. जेव्हा त्वचेवर सहा किंवा त्याहून अधिक ठिपके असतात किंवा दोन किंवा त्याहून अधिक नसा प्रभावित होतात, तेव्हा मल्टी-बॅसिलरी कुष्ठरोग असे लेबल लावले जाते, असे १७७ रुग्ण आहेत तर, पॉसिबॅसिलरी (पीबी) कुष्ठरोग हा कुष्ठरोगाचा एक प्रकार असून, ज्यामध्ये कमी बॅक्टेरियाचा भार असतो, असे ४५ रुग्ण असल्याची महापालिकेच्या आरोग्य विभागाची माहिती आहे.

या लक्षणांकडे लक्ष देण्याची गरज…

शरीरावर पिवळा, लालसर डाग किंवा चट्टा, अंगावरील गाठी, कानाच्या जाड झालेल्या पाळ्या, स्नायूंचा अशक्तपणा, चट्ट्याच्या जवळून जाणारी नस जाड बनते व दुखते. ही लक्षणे दिसताच मनपा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासून घ्यायला हवे किंवा आपल्या क्षेत्रातील आशा सेविकांना माहिती द्यायला हवी, प्राथमिक अवस्थेत कुष्ठरोगावर उपचार केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होतो, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्वचेसह मज्जासंस्थेवर आघात

कुष्ठरोग हा आजार एम. लेप्रा या जीवाणूच्या संक्रमणाने होतो. यामध्ये हे जीवाणू रुग्णाच्या त्वचेवर व मज्जासंस्थेवर आघात करतात. त्यामुळे शरीरावर चट्टे दिसतात व ३ वेळेवर उपचार न झाल्यास विकृती होण्याची शक्यता असते. हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे ३ रुग्णाच्या घरातील व संपर्कात येणाऱ्या व्यक्तींनाही हा रोग होण्याची संभावना असल्याचे महापालिकेचे म्हणने आहे.