नागपूर: दिवाळीच्या काळात एसटी आणि रेल्वे फुल्ल असल्याचा फायदा खासगी बसचालक घेत आहेत. परिवहन विभागाच्या नियमाप्रमाणे एसटी तिकीट दराच्या तुलनेत ५० टक्के अधिक दर घेण्याची मुभा खासगी बसचालकांना दिली आहे. प्रत्यक्षात एसटीच्या तुलनेत दुप्पट तर काहीवेळा तिप्पट दर आकाराला जात असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहे. परंतु याकडे आरटीओकडून दुर्लक्ष केले जात आहे.

दिवाळीच्या तोंडावर पुणे, हैद्राबाद, नाशिकसह इतरही भागातून नागपुरात येणाऱ्या प्रवाश्यांची खासगी ट्रॅव्हल्सकडून सर्रास आर्थिक लूट केली जात आहे. दिवाळी संपल्यावर परतीच्या प्रवासात तर दर जवळपास तिप्पटच होतात. दरम्यान, आता दिवाळीपूर्वीच भाडे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्याहून नागपूर, अकोला येण्यासाठी खासगी बसचे दर दुप्पट झाले आहेत. गैर सिझन असलेल्या काळातील विमान प्रवासाचे भाडे बससाठी लागत असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे.

हेही वाचा – फटाक्यांच्या मोसमात पावसाची आतषबाजी, महाराष्ट्रात पुन्हा…

दरम्यान सध्या नागपूर- पूणे दरम्यान पाच हजार रुपयांपर्यंतचे भाडे काही ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून आकारले जात आहे. तर हैद्राबादसाठीही तीन हजार रुपयांहून जास्त रक्कम आकारली जात आहे. ही पोलखोल होऊ नये म्हणून ऑनलाईन बुकींगमध्ये प्रथम सीट नसल्याचे ट्रॅव्हल्सकडून कळवले जाते. त्यानंतर वेळेवर प्रवासाठी येणाऱ्यांकडून रोखीने पैसे घेऊन अवास्तव रक्कमही आकारली जात असल्याचे प्रवाशी सांगतात. दरम्यान पुण्याहून नागपूर, अकोलासह विदर्भातील मार्गातील शहर, गावात सुटणाऱ्या खासगी बस चालकांकडून बुकिंग फुल्ल असल्याचे सांगून अधिकचे भाडे वसूल केले जात आहे. हा धक्कादायक प्रकार सर्वश्रूत असतानाही आरटीओकडून दुर्लक्ष होत असल्याचा प्रवाश्यांचा आरोप आहे.

आताच बुकींग फुल्ल

दिवाळीमध्ये खासगी बस अतिरिक्त धावतात. अनेक बसचालक गाड्या दुसऱ्यांकडून भाडेतत्वावर घेतात. त्यामुळे अशा गाड्यांचे तिकीट दर अन्य बसच्या तुलनेत अधिक असते. पुण्यातून विदर्भात दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. अनेक खासगी बसचालक ३०० किलोमीटरहून अधिक दूरच्या प्रवासासाठी धावणाऱ्या बसच्या दरात मोठी वाढ करतात. तुलनेत साध्या बससाठी (सीटिंग) कमी दरवाढ केली जाते. यंदा २८ ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. त्यामुळे विलंबाने प्रवासाचे नियोजन केल्याने पुण्याहून सुटणाऱ्या खासगी बस आत्ताच बुक झाल्या आहेत. त्यामुळे रेल्वेचे तिकीट मिळत नसल्याने प्रवाश्यांना नाईलाजाने महागड्या तिकीटावर ट्रॅव्हल्समधून यावे लागत आहे.

हेही वाचा – ‘…तर ‘नोटा’ला मतदान’ हलबा समाज भाजप, काँग्रेसवर नाराज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परतीचा प्रवास आणखी महाग

दिवाळी संपल्यानंतर परतीचा प्रवास आणखी महाग होतो. कोणत्याही परिस्थितीत नोकरी निमित्ताने पुण्याला जावे लागते. त्या वेळी एसटी आणि रेल्वेचे आरक्षण फुल्ल असते. त्यामुळे पुणे गाठण्यासाठी प्रवाशांना खासगी बसवर अवलंबून राहावे लागते. अशा वेळी खासगी बसचालक दिवाळीत जो दर आकारतात, त्यात आणखी ५०० ते एक हजार रुपयांची प्रवास भाड्यात वाढ केली जाते, असे प्रवाश्यांचे म्हणणे आहे.