अकोला, वाशीम , यवतमाळमध्ये जोरदार पाऊस, वीज पडून ३ ठार

नागपूर : विदर्भातील अकोला, वाशीम, यवतमाळ जिल्ह्य़ात पावसाने जोरदार हजेरी लावली. नागपूर शहरातही हलक्या सरी बरसल्या. वीज पडून अकोला जिल्ह्य़ात दोन, वाशीम जिल्ह्य़ात एक अशा एकूण तिघांचा मृत्यू झाला. रामटेक तालुक्यातील आसोली येथे गुरुवारी रात्री जिल्हा परिषद शाळेजवळ वीज कोसळून आठ विद्यार्थी जखमी झाले. यवतमाळ जिल्ह्य़ातील आर्णी तालुक्यात कोसदणी घाटातील कच्चा रस्ता वाहून गेल्याने नागपूर- तुळजापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

संपूर्ण विदर्भाचे लक्ष पावसाकडे लागले आहे. आकाशात ढगांची गर्दी होऊनही पाऊस येत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. उकाडय़ामुळे नागपूरकर हैराण झाले आहे. या पाश्र्वभूमीवर गुरूवारी रात्री आणि शुक्रवारी नागपूरसह विदर्भातील काही भागात पावसाने हजेरी लावली.

नागपुरात शुक्रवारी सकाळी काही भागात तर रात्री अंबाझरी लेआऊटसह काही भागात पावसाच्या जोरदार सरी आल्या. मात्र त्याचे स्वरुप सार्वत्रिक नव्हते. मात्र गारव्यामुळे उकाडय़ातून अंशत: दिलासा मिळाला.

दरम्यान, विदर्भात अकोला जिल्ह्य़ातील बोराळा( ता. बाळापूर) येथे शुक्रवारी दुपारी शेतात पेरणी करीत असताना वीज पडल्याने कपिल दीपक शेगोकार (१६) व बाळू नारायण उमाळे (५५) या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.   रामटेक व मौदा येथे पाऊस पडला. वाशीम जिल्हय़ात मानोरा तालुक्यातील घोटी शिवारात वीज पडून  पिंटू शिंदे (२८)या मेंढपाळाचा मृत्यू झाला.

यवतमाळ जिल्ह्य़ात शुक्रवारी पहाटेपासून काही भागात मुसळधार पाऊस झाला. नागपूर-तूळजापूर महामार्गावरील कोसदणी घाटात कच्चा रस्ता वाहून गेल्याने महामर्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

दुपारी ४  नंतर मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. अमरावती, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यत मात्र पाऊस रिमझम होता.