नागपूर : मतदार यादीतील घोळ असो वा मतं यंत्र बद्दलची शंका आम्ही भारतीय निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो आणि त्याच्या चौकशीची मागणी करतो तर भाजप आणि राज्याचे मुख्यमंत्री त्यावर उत्तर देतात, आमचा प्रश्न आयोगाला असतो पण उत्तर मात्र मुख्यमंत्र्याकडून घेतले हे अजिब आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले. नागपूर पत्रकार क्लब तर्फे शरद पवार यांच्याशी आज वार्तालाप आयोजित केला होता त्याप्रसंगी ते एका प्रश्नाच्या उत्तरात असे म्हणाले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या पावर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे मतपत्रिकेतील घोळ उघडकीस आणला आहे. त्यानंतर संपूर्ण देशात मतदार यादी विषयी शंका निर्माण झाली असून ते योग्य नाही. त्यामुळे भारतीय निवडणूक आयोगाने या या शंकेचे निरसन करण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आज नागपुरातून बंडल यात्रेचा शुभारंभ होत आहे. त्यासाठी शरद पवार नागपुरात आले असता त्यांनी पत्रकार क्लब येथे पत्रकारांशी संवाद साधला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) ओबीसी सेलतर्फे आज क्रांती दिनी राज्यभर मंडल यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार हिरवी झेंडी दाखवणार आहेत. ही यात्रा आशिर्वाद लॉन, सीताबर्डी येथून दुपारी साडेबाराला निघेल. यावेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित राहतील.
या यात्रेसाठी शरद पवार यांचे शुक्रवारी दुपारी विमानतळावर आगमन झाले. मंडल आयोगाची अंमलबजावणी ही ओबीसींच्या जीवनातील सर्वात मोठी सामाजिक परिवर्तन घडविणारी बाब ठरली. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी मंडल आयोग राज्यात सर्वप्रथम लागू केला होता. शरद पवार यांनी ओबीसीसाठी काय केले, याची माहिती राज्यातील जनतेला व्हावी यासाठी ही यात्रा काढण्यात येणार आहे. मंडल आयोग राज्यात सर्वप्रथम लागू करून शरद पवार यांनी ओबीसी समाजाला अधिकृत व हक्काचे आरक्षण मिळून दिले. ओबीसींची
जातीनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह देशातील सर्वच विरोधी पक्ष करीत होते. परंतु, भाजपने याला विरोध केला. दबाव वाढल्याने केंद्र सरकारने ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याचे जाहीर केले. परंतु, ही जनगणना कधी करणार याची मात्र, कोणतीही घोषणा केली नाही. भाजपचे ओबीसीविरोधी धोरण आणि शरद पवार यांनी ओबीसी समाजासाठी केलेले कार्य हे जनतेपर्यंत पोचविण्यासाठी ही मंडल यात्रा काढण्यात येत आहे. पहिल्या टप्पात विदर्भातील ११ जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे असे सलिल देशमुख यांनी सांगितले.