लोकसत्ता टीम

नागपूर : आसाममधील दिमा हासाओ जिल्ह्यातील एका कोळसा खाणीत ६ जानेवारीला मोठ्या प्रमाणात पाणी शिरून ९ हून अधिक कामगार अडकून पडले. या सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी नागपुरातील ‘वेस्टन कोलफिल्ड लिमिटेड’चे (वेकोलि) पथक आसामला रवाना झाले. भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने हे पथक ८ जानेवारीला रात्री घटनास्थळी पोहचले. १५० मीटर उंचीवरून प्रतिमिनिट ५०० गॅलन पाणी पंप करू शकणाऱ्या ‘सबमर्सिबल पंप’सह इतरही महत्त्वाचे साहित्य सोबत नेण्यात आले, अशी माहिती नागपूर ‘वेकोलि’चे जनसंपर्क अधिकारी मिलिंद चहांदे यांनी दिली.

‘वेकोलि’चे नेतृत्व इलेक्ट्रिकल मेंटनेन्स विभागाचे व्यवस्थापक सुरेश सिंग गौर करत आहेत. यामध्ये दिलीप किणेकर, दिलीप नगरल, गुरजीत, अजय बोंडे यांचा समावेश आहे. घटनास्थळी सध्या लष्कर, आसाम रायफल्स, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकांकडून बचावकार्य सुरू आहे. खाणीतून पाणी बाहेर काढण्यासाठी उपकरणांचा अभाव असल्याने तेथील यंत्रणेकडून नागपुरातील ‘वेकोलि’ला मदत मागण्यात आली होती.

आणखी वाचा-ताडोबा ऑनलाईन बुकींग घोटाळा, तीन महिन्यांपूर्वीच अधिकाऱ्यांची चौकशी

आसाममधील दिमा हासाओ या डोंगराळ जिल्ह्यातील उमरांग्सोपासून २५ किमी अंतरावर असलेल्या आसाम-मेघालय सीमावर्ती भागात खोल कोळसा खाणीत पाणी शिरल्याने ९ कामगार अडकून पडले. त्यापैकी एकाचा मृतदेह भारतीय लष्कराने बुधवारी बाहेर काढला. उर्वरित कामगारांसाठी बचावकार्य अद्यापही सुरू आहे.

चौथ्या दिवशीही शोधमोहीम

कोळसा खाणीत अडकलेल्या कामगारांच्या शोधासाठी विविध राज्य आणि केंद्रीय यंत्रणांचे बचावकार्य गुरुवारी चौथ्या दिवशीही सुरू होते. रात्रभर खाणीतील पाणी ओसरल्यानंतर सकाळी शोधमोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. ‘रिमोट ऑपरेटेड वाहना’च्या (आरओव्ही) साह्याने कामगारांचा शोध घेतला जात आहे. आतील पाणी पूर्णपणे काळवटले असून, कामगारांचा शोध घेण्यात अडचणी येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

आणखी वाचा-मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटना काय ?

आसाममधील दिमा हासाओ जिल्ह्यातील एका कोळसा खाणीत ६ जानेवारीला अचानक मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने सुमारे ९ कामगार अडकून पडले. ही घटना दिमा हसाओ जिल्ह्यातील उमारांग्सोच्या कलामती भागात घडली. हा जिल्हा डोंगराळ भाग आहे. दुर्घटना घडली तो भाग अत्यंत दुर्गम असून जिल्हा मुख्यालय हाफलाँग पासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर आहे. ही माहिती कळताच केंद्र व राज्यातील बचाव पथकांकडून तेथील कामगारांना बाहेर काढण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न केले जात आहे. येथे बचाव कामादरम्यान एका कामगाराचा मृतदेहही बाहेर काढण्यात यंत्रणेला यश आले आहे. तर इतर कामगारांना वाचवण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केले जात आहे.