नागपूर : राज्य सरकारमध्ये विकास कामांपेक्षा खाते वाटपावर अधिक चर्चा सुरू आहे. जनता उपाशी आणि सरकार तुपाशी, अशी सध्याची अवस्था असून महाराष्ट्राला हे भूषणावह नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना नागपुरात केली.

तपास यंत्रणांची भीती दाखवून विरोधकांना गप्प केले जात आहे. कोणाकडे कुठले खाते जाणार याच्याशी जनतेला काही देणेघेणे नाही. सरकार आता मायबाप राहिला नाही. हे शिंदे -फडणवीस आणि पवार सरकार आता जनतेला लुटणारे सरकार झाले आहे. जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. अनेक भागांत पेरण्या झाल्या नाही. अवकाळी पावसाची मदत मिळाली नाही. शेतकरी आत्महत्या सुरू आहेत. याचे कोणालाच देणेघेणे नाही. राज्याचे कृषिमंत्री शेतकऱ्यांना लुटायला निघाले आहेत. नकली पथक करून कृषी केंद्रावर आपलेच अधिकारी पाठवायचे व लुटायचे असे सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. कलंक या शब्दावरून भाजपा आणि ठाकरे गटामध्ये वाद सुरू असताना महाराष्ट्राला भाजपाने कलंक लावून ठेवलेला आहे, अशी टीका पटोले यांनी केली.

हेही वाचा – बुलढाणा: नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या बालकाचा मृतदेहच आढळला; ढोरपगावावर शोककळा

हेही वाचा – ‘मुलांनो, जंकफूड नको तृणधान्य खा आणि शक्तिमान बना’; मिलेट मिशनचा सूर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्ही आणि राष्ट्रवादी अनेक वर्षे सत्तेत राहिलो. अजित पवार आमच्या सोबत कसे करायचे आणि कसे बाणा दाखवायचे हे आम्हाला माहीत आहे. ते आता का चूप आहेत, असा प्रश्न पटोले यांनी केला. सध्या ठाकरे गट व भाजपा यांच्या कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरे, फडणवीस यांच्या फोटोला जोडे मारणे हे खालच्या पातळीचे राजकारण आहे, काँग्रेस असे कधीच करत नाही, असा महाराष्ट्र कधी नव्हता. विकास व विचारानेही महाराष्ट्र संपत आहे. याला भाजपा जबाबदार आहे, अशी टीका पटोले यांनी केली.