नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळ समितीने आज रेल्वे मंत्रालयाचे ११,१६९ कोटी रुपयांच्या खर्चाचे चार प्रकल्प मंजूर केले. विशेष म्हणजे, यातील दोन प्रकल्प महाराष्ट्रात असून, त्यातील एक नागपूर-इटारसी चाैथ्या रेल्वेलाइनचा आणि दुसरा संभाजीनगर परभणी दुसऱ्या लाइनचा आहे. या चार प्रकल्पामुळे रेल्वेच्या सध्याच्या नेटवर्कमध्ये ५७४ किलोमीटरचा वाढ होणार आहे. या बहुट्रॅकिंग प्रकल्पामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा आणि झारखंड अशा सहा राज्यांतील १३ जिल्ह्यांमध्ये रेल्वे कनेक्टिव्हिटीत वाढ होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या “गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन”अंतर्गत नियोजन करण्यात आलेल्या या प्रकल्पांमुळे नमूद राज्यातील २,३०९ गावांतील ४३.६० लाख लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ होणार आहे. प्रवासी आणि माल वाहतुकीच्या दृष्टीने येणारे अडथळे दूर होणार असून, सुलभ, जलद आणि विश्वासार्ह सेवा मिळण्यासही त्यांची मदत होणार आहे.

भारतीय जनता पार्टी नागपूर महानगरचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी संपूर्ण नागपूरकरांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून नागपूर ते इटारसी चौथ्या रेल्वे लाईनसाठी मंजूर करण्यात आलेल्या ५,४५१ कोटींच्या निधीसाठी आभार व्यक्त केले आहेत. तिवारी यांनी पत्रात नमूद केले आहे की, या प्रकल्पामुळे प्रवाशांना अधिक सोयी मिळतील, वेळेची बचत होईल आणि मालवाहतुकीसही गती मिळेल. यामुळे देशाच्या आर्थिक मजबुतीसही चालना मिळेल.

भाजपा नागपूर महानगर आणि नागपूर शहरवासीयांच्या वतीने तिवारी यांनी पंतप्रधानांसह संपूर्ण मंत्रिमंडळाचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. तसेच भविष्यातही मोदींच्या नेतृत्वाखाली नागपूरला अशीच मान्यता आणि विकास मिळत राहील, अशी आशा व्यक्त केली आहे.या पत्राची प्रत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चौहान यांना पाठवून त्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले आहे.

रोजगार, व्यापार, उद्योगाला लाभ

पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या “गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन”अंतर्गत नियोजन करण्यात आलेल्या या प्रकल्पांमुळे नमूद राज्यातील २,३०९ गावांतील ४३.६० लाख लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ होणार आहे. प्रवासी आणि माल वाहतुकीच्या दृष्टीने येणारे अडथळे दूर होणार असून, सुलभ, जलद आणि विश्वासार्ह सेवा मिळण्यासही त्यांची मदत होणार आहे. इटारसी-नागपूर फोर्थ लाइन आणि औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) – परभणी सेकंड लाइनमुळे एकीकडे रेल्वेची प्रवासी तसेच मालवाहतूक सुसाट होणार असून, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. त्या-त्या भागातील व्यापार तसेच स्थानिक उद्योगांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेच्या दिशेने एक ठोस पाऊल पडण्याचेही संकेत या प्रकल्पामुळे आहे.