वर्धा: व्यापारात स्टॉक मार्केट महत्वाची भूमिका बजावतो. नागरिक या प्रक्रियेत थेट जुळतो. शेतकऱ्यांचे काय ? तर त्यांच्या कृषी मालाच्या भावाचे चढ उतार, साठवणूक, विक्री केंद्र व अन्य व्यवहारासाठी एनसीडीईक्स हे केंद्र म्हणजेच राष्ट्रीय कमोडिटी आणि डेरीव्हेटिव्हज एक्सचेंज होय. कृषी उत्पादनांच्या व्यापारासाठी खास तयार केलेली ही प्रणाली आहे. राष्ट्रीय पातळीवर कृषी उत्पादनांच्या व्यापारासाठी एकही केंद्रीय व्यासपीठ नव्हते. ते काम ही संस्था करते. कुठल्या पिकाचे कोणत्या भागात काय भाव आहे हे तपासण्याची संधी मिळते. त्यानुसार शेतकरी आपल्या मालाची गुंतवणूक करू शकतो.
स्थानिक बाजारपेठेत असलेला कृषी माल काय किंमतीत विकल्या जाऊ शकतो, याचे मार्गदर्शन मिळत असल्याने शेतकऱ्यास दोन पैसे अधिक कमविण्याची संधी देणारे हे केंद्र आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमालाच्या किंमतीत चढउतार व त्याचा फटका शेतकऱ्यांना, हे नेहमीचे चित्र. मात्र या केंद्रात नोंदणी झाल्यास धोका टळणार. ईथे ज्या दिवशी विक्री करार ज्या भावाने झाला, त्याच भावाने भविष्यात माल घेणे अनिवार्य ठरते. खरेदीदार व्यापारी व शेतकरी यातील मध्यस्थ म्हणून हे स्टॉक एक्सचेंज कार्य करते. त्यासाठी या ठिकाणी खाते काढावे लागते. ते उघडले की खरेदी विक्री सूरू. कृषी उत्पादनांची देवाणघेवाण शक्य.
आतापर्यंत या एक्सचेंजचे गुजरातमधील कडी व महाराष्ट्रात अकोला असे दोनच केंद्र होते. आता वर्धा जिल्ह्यातील आर्वीत तिसरे सूरू झाले आहे. या भागात कापूस व सोयाबीनचे मुख्य उत्पादन होते. पण भाव मिळत नव्हता. हे केंद्र आता देशात जिथे चांगला भाव असेल तिथे ऑनलाईन विक्रीची सोय निर्माण करणार. सरकी, ढेप यांस पण चढ्या दरात विकता येणार. हे केंद्र सूरू व्हावे म्हणून जिनिंग प्रेसिंग व तेल गिरणी संघटनेने प्रस्ताव केला होता. केंद्र स्थापन झाल्याने पूर्व विदर्भातील कापूस उत्पादक व व्यापारी वर्ग लाभ घेऊ शकतील. परिसरात विविध उद्योग सूरू होतील, अशी शक्यता व्यक्त होते.
या एक्सचेंजसाठी पाठपुरावा करणारे आमदार सुमित वानखेडे म्हणतात की शेतकरी व व्यापारी यांना एकाचवेळी लाभ मिळवून देणारी ही ऑनलाईन यंत्रणा आहे. या भागातील शेतीनिष्ठ जीवनास आर्थिक उन्नती दिसलीच नाही. पडेल भावात शेतमाल विकता विकता पिढ्या गारद झाल्या. आता तसे होणार नाही. हे केंद्र वाढता दर मिळवून देणार. कारण अशी यंत्रणा असते, हे कुणाच्या गावीच नव्हते. सोबतच वेअरहाऊस निर्मिती साठवणूक करण्यास होईल. रोजगार व व्यापार व्यवहार वाढणार, असा विश्वास आमदार वानखेडे व्यक्त करतात.