अमरावती : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये चिन्ह आणि पक्ष कुणाचा याबाबत ६ ऑक्टोबरला निवडणूक आयोगात सुनावणी पार पाडणार आहे. पक्ष आणि चिन्‍ह आम्‍हालाच मिळेल, असा दावा अजित पवार गटाकडून केला जात असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी त्‍यावर प्रश्‍नचिन्‍ह उपस्थित केले आहे.

येथे पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे म्‍हणाल्‍या, मला थोडी भीती वाटायला लागली आहे. मला वाटते निवडणूक आयोगाचा पेपर फुटला आहे. नाहीतर काहीतरी गोलमाल आहे. राष्‍ट्रवादी कॉंग्रेसमधून बाहेर गेलेल्‍या घटकाचे वरिष्‍ठ नेते तारखेवार आम्‍हाला या दिवशी पक्ष मिळेल, या तारखेला पक्षाचे चिन्‍ह मिळेल, असा दावा करताहेत. यांना निवडणूक आयोगाचा निकाल कसा कळला, अजून तर आयोगाकडे सुनावणी देखील सुरू झालेली नाही. परीक्षेला बसण्‍याआधीच त्‍यांना आपले गुण माहिती झाले आहेत, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

हेही वाचा >>> “प्रियंका गांधी महाराष्‍ट्रातून निवडणूक लढल्‍यास आनंदच”, यशोमती ठाकूर म्‍हणाल्‍या, “अमरावती मतदार संघ जर…”

सुप्रिया सुळे म्‍हणाल्‍या, वेगळ्या झालेल्‍या घटकाकडे दिल्‍लीतील कुणीतरी माहीतगार असावा, जो यांना तारखेसहीत सर्व माहिती पुरवीत आहे. परीक्षा देण्‍याआधीच त्‍यांना आपल्‍याला पक्ष आणि चिन्‍ह मिळेल, असा दावा ते कसा काय करू शकतात. निवडणूक आयोगाकडील सुनावणी पारदर्शक आणि नि:पक्षपातीपणाने व्‍हायला हवी, अशी आमची अपेक्षा आहे. त्‍यांना जर निकाल ठाऊक असेल, तर निश्चितपणे काहीतरी गोलमाल सुरू आहे, असे त्‍या म्‍हणाल्‍या.

हेही वाचा >>> “हे तर खुनी सरकार…” नांदेडच्‍या रुग्णालयातील मृत्‍यूसत्रावरून सुप्रिया सुळे यांची टीका; म्हणाल्या, “लोकांच्या मनात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवार हे भाजप सरकारला येत्‍या पंधरा  दिवसात पाठिंबा देणार, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. याविषयी विचारले असता, सुप्रिया सुळे यांनी अजून अकरा दिवस राहिले आहेत, वाट बघू, असा टोला लगावला. आपल्‍याकडे अशा गोष्‍टींसाठी वेळ नाही. शेतकरी, सर्वसामान्‍यांचे अनेक प्रश्‍न समोर आहेत. सोयाबीन उध्‍वस्‍त झाले आहे. कापसासह इतर पिकांचे उत्‍पादन कमी होण्‍याची शक्‍यता आहे. दुष्‍काळी परिस्थितीत लोकांना मदत करण्‍याची आवश्‍यकता आहे. आपले लक्ष त्‍याकडे आहे.