लोकसत्ता टीम
नागपूर: उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह शहर असलेल्या नागपुरात तापमान वाढत असतानाच दुसरीकडे सिव्हिल लाईन्स, रामदासपेठ, मानकापूर, सोनेगावसह इतरही बऱ्याच भागात वारंवार वीज पुरवठा खंडित आहे.
महावितरणकडून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आणि पावसाळा जवळ आल्यावर मोठ्या प्रमाणावर दुरूस्तीची कामे केली जातात. नागरिकांना अखंडित वीज पुरवठा व्हावा हा त्यामागचा उद्देश असतो. परंतु काही दिवसांपूर्वी नागपुरात वादळीवाऱ्यासह पडलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणावर वीज यंत्रणा विस्कळीत झाली होती. त्यावेळी महावितरणने देखभाल- दुरूस्तीचेही काम केल्याचा दावा केला.
आणखी वाचा-केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांचा विदर्भ दौरा ग्रामीण भागासाठी फलदायी!
परंतु, सिव्हील लाईन्स, रामदासपेठ, सेमिनेरी हिल्स, सोनेगाव, गायत्री नगर आणि इतरही भागात अधून- मधून वीज पुरवठा खंडित होत आहे. मानेवाडातील महालक्ष्मी नगर परिसरात दिवसात सुमारे ५ वेळा वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा मन:स्ताप सहन करावा लागला. महालक्ष्मीनगर परिसरात काल रात्री केबलमध्ये बिघाड झाल्याने वीज खंडित झाली. पण, तातडीने दुरूस्तीचे काम करून पुरवठा सुरळीत झाल्याचा दावा महावितरणने केला. सिव्हिल लाईन परिसरातही काही मिनटांची ट्रिपिंग झाल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.