चंद्रपूर : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच आज, मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास चंद्रपूर शहरालगत असलेल्या मारडा गावात वीज कोसळून एकाचा मृत्यू, तर तीन जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

मारडा गावाजवळ पांदण रस्त्याचे काम सुरू असताना अचानक विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. यावेळी काम करणारे आनंदराव हरिश्चंद्र वायरे आणि त्यांचे तीन सहकारी जवळच उभ्या असलेल्या बंद ट्रॅक्टरखाली आश्रयासाठी थांबले. अशातच ट्रॅक्टरवर वीज कोसळली. या घटनेत आनंदराव वायरे यांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तीन जण जखमी झाले आहेत.