गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कवंडे गावालगत ११ मे रोजी नक्षलवाद्यांनी तळ ठोकल्याची माहिती मिळाल्यावरुन सी- ६० जवानांनी अभियान राबविले. यावेळी जवान व नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. यावेळी नक्षलवाद्यांचा तळ उध्दवस्थ करण्यात जवानांना यश आले. जवान आक्रमक झाल्यानंतर नक्षलवाद्यांनी तेथून काढता पाय घेतला. छत्तीसगड सीमेवर असलेल्या कवंडे या नक्षलग्रस्त गावात ९ मार्च रोजी पोलिसांनी २४ तासांत पोलीस ठाणे उभारले होते.

नक्षलवाद्यांचे गड समजल्या जाणाऱ्या छत्तीसगड सीमेलगत पेनगुंडा, नेलगुंडा व पाठोपाठ कवंडे या गावात चालू वर्षी पोलीस ठाणे उभारण्यात आले आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांची कोंडी झाली आहे. ११ मे रोजी काही नक्षलवादी कवंडे गावाजवळ जंगलात तळ ठोकून बसले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळाली. त्यानुसार, अपर अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वात सी- ६० च्या २०० जवानांनी अभियान राबविले.

१२ मे रोजी नक्षलवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला, त्यास सी- ६० जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. २ तासांच्या कालावधीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी नक्षलवाद्यांशी अधूनमधून गोळीबार झाला. पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतल्यावर नक्षलवाद्यांनी पळ काढला.

घटनास्थळावरुन साहित्य जप्त

नक्षलवादी पळून गेल्यानंतर परिसरात जवानांनी शोधमोहीम राबविली. यात दोन शस्त्रे जप्त केली. एक स्वयंचलित इन्सास आणि एक सिंगल शॉट रायफल, एक मॅगझिन,जिवंत काडतुसे, डेटोनेटर, एक रेडिओ, ३ पिथस, डब्ल्यूटी चार्जर आणि मोठ्या प्रमाणात नक्षलवादी साहित्य आढळले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चकमकीनंतर परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र केले आहे. या चकमकीनंतर परिसरात शस्त्रे व साहित्य आढळून आले,ते जप्त केले आहे. नक्षलवाद्यांचा मृतदेह आढळून आला नाही, पण ते जखमी किंवा मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. इतर नक्षलवाद्यांनी त्यांना तेथून नेले असावे, अशी शक्यता आहे.- नीलोत्पल, पोलीस अधीक्षक