यवतमाळ : शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अजूनही केवळ गद्दार, खोके या भोवतीच गुरफटले आहेत. मात्र, निवडणुका भावनिक वातावरण करून जिंकता येत नाहीत. पक्षातून बाहेर पडलेल्यांना उद्धव ठाकरे गद्दार म्हणतात, पण २०१९ मध्ये युतीची सत्ता आली असताना विरोधकांसोबत सत्ता स्थापन करून उद्धव ठाकरे यांनीच जनतेसोबत गद्दारी केली आहे. त्यामुळे खरे गद्दार तर उद्धव ठाकरेच आहेत, अशी घणाघाती टीका भाजपचे विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

आज, गुरुवारी येथील विश्राम भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, महादेव सुपारे, विलास महाजन, अजय खोंड आदी उपस्थित होते. पुढे बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, सत्तेत असताना काही नाही करायचे आणि आता एका दिवसात चार-चार सभा घ्यायच्या, अशाने निवडणूक जिंकता येत नसल्याचा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

हेही वाचा – “मी कोरे पाकीट, जो पत्ता टाकला जाईल तिकडे पोहोचेल”, चंद्रकांत पाटलांकडून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचे संकेत

सीएए समर्थनात बाळासाहेब ठाकरे यांनी काय भूमिका घेतली होती, उद्धव ठाकरे आता या कायद्याला विरोध करीत आहे. काँग्रेससोबत सत्तेत गेल्यानंतर उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाचा विसर पडल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला. निवडणुका जिंकण्यासाठी काम करावे लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्यापलीकडे उद्धव ठाकरे काहीच बोलत नाही. जिल्ह्यात आल्यानंतर विकासावर बोलण्याऐवजी त्यांनी केवळ राजकीय आरोप केल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले.

हेही वाचा – महाविकास आघाडीचे अखेर ठरले! ‘हा’ पक्ष लढवणार बुलढाण्याची लोकसभा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महायुतीचा जागा वाटपाचा तिढा दोन दिवसांत सुटणार आहे. कोणती जागा कोणी लढावी यासाठी भाजप-शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते यावर निर्णय घेणार आहे. विजयी होणारा उमेदवार ज्या पक्षाकडे असेल त्यांना ती जागा द्यावी असाच प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघांची जागा कोण लढणार, हे दोन दिवसांत स्पष्ट होईल, असे सांगून प्रवीण दरेकर यांनी याबाबत अधिक भाष्य करणे टाळले.