नागपूर : राज्याचे मत्स्योद्योग मंत्री नीतेश राणे गेल्या काही महिन्यांपासून मुस्लीम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत आहेत.राणे यांच्या वक्तव्यामुळे दोन समाजात तेढनिर्माण होत आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे प्यारे खान यांनी म्हटले आहे.अलीकडे त्यांनी गोवंश बंदी आणि कुर्बाणी यावरून त्यांनी पुन्हा मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.
राणे महाराष्ट्र बरबाद करीत आहेत, अशी टीका खान यांनी केली आहे. आपण यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहोत. वादग्रस्त व सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या अनेक नेत्यांना त्यांनी बाजूला सारले आहेत. या यादीत लवकरच राणे यांचाही समावेश होणार असल्याचा दावा प्यारे खान यांनी केला.राणे यांना अल्पसंख्याक आयोगामार्फत नोटीस पाठवणार आहोत. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन जे काही बोलतात ते महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुफी कॉरिडॉर बनवण्याचे काम हाती घेऊन देशाला एकतेचा संदेश देत आहेत. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एकोपा राहावा याचे प्रयत्न मोदी आणि फडणवीस सरकार करीत असताना नितेश राणे वातवारण कलुषित करीत आहेत. आम्ही सर्व भारतीय मुस्लिम आहोत, असे खान म्हणाले.
भारतात गोवंश बंदी कायदा आहे. हे आम्हालासुद्धा माहीत आहे. कुराणानुसार त्याचे पालन केले जाते. कुर्बाणी देताना इतरांना त्रास होऊ नये, याची काळजी घेतली जाते. या राज्यातील मुस्लिम बांधवांनी हीच भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस यांचे संस्कार नितेश राणे यांच्यामध्ये नाहीत. फडणवीस यांचे नाव घ्यायची त्यांची लायकीसुद्धा नाही.
राणे यांनी जबाबदारीने बोलावे. उद्या काही अप्रिय घटना घडली तर त्याला नितेश राणे हेच जबाबदार राहतील असाही इशारा प्यारे खान यांनी दिला. मुख्यमंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्याची दखल घेतील. त्यांनी अनावश्यक बोलणारे आणि सरकारच्या दिशानिर्देशाचे उल्लंघन करणाऱ्या अनेक नेत्यांना बाजूला केले आहे. यात नितेश राणे यांचाही लवकरच नंबर लागणार असल्याचे प्यारे खान यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान राज्यातील मंत्री नितेश राणे यांच्याविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करणार आहेत. नितेश राणे यांनी बेजबाबदार वक्तव्य करणे चुकीचे आहे. त्यांनी मुस्लीम समजाबद्दल दृष्टीकोन बदलावे. त्यांच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे महाराष्ट्र सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य करून सरकारची प्रतिमा मलिन करून नये, असे राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी म्हटले आहे.
नितेश राणे गेल्या काही महिन्यांपासून मुस्लीम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा बुरख्याबद्दल वक्तव्य केले आहे. राणे यांच्या वक्तव्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होत आहे.