नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावरून देशाच्या चारही दिशांना रेल्वेगाड्यांचे आवागमन होत असते. त्यामुळे नागपूरच्या चारही बाजूला तिसरा आणि चौवथा रेल्वे मार्ग तयार करण्यात येत आहे. आता नागपूर रेल्वे स्थानकावर ‘रूट रिले इंटरलॉकिंग’मध्ये बदल करण्यात येत असल्याने आणि तिसरा रेल्वे मार्ग सुरू करण्याची चाचणी घेण्यात येत असल्याने नागपूर आणि इतवारी रेल्वे स्थानकांवरून धावणाऱ्या काही रेल्वेगाड्या उशिरा धावत आहेत.
मुंबई-हावडा आणि दिल्ली-चेन्नई अशा देशातील चार महत्वाच्या शहरांना जोडणाऱ्या रेल्वेगाड्या नागपूरमार्गे धावतात. याशिवाय कोळसा, मॅग्निज आणि लोखंडाची मोठ्या प्रमाणावत वाहतूक होते. त्यामुळे नागपूरच्या चारही दिशांकडे जाणारे रेल्वेमार्ग अत्यंत व्यस्त आहे. आता तिसरा रेल्वे मार्ग टाकण्याचे काम वेगात सुरू आहे. त्यानंतर चौवथा रेल्वे मार्ग तयार करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेचा नागपूर विभागातील नागपूर आणि इटारसी रेल्वे स्थानकादरम्यानच्या तिसऱ्या लाईनच्या कमिशनिंगचा भाग म्हणून नागपूर स्थानकावर प्रमुख रूट रिले इंटरलॉकिंग मॉडिफिकेशनची कामे हाती घेणार आहे. विशेषतः गोधनी रेल्वे स्थानाकापासून उत्तरेकडे जाणाऱ्या मार्गावर सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन विभागाकडून हे महत्त्वाचे पायाभूत सुविधांचे अद्यावतीकरण केले जात आहे. त्यासाठी वाहतूक नियंत्रण करण्यात आली आहे.
१५ ते २० मे २०२५ दरम्यान प्री-नॉन इंटरलॉकिंग (प्री-एनआय) कामे केली जातील. त्यानंतर २१ मे २०२५ रोजी अप गुड्स लूप लाईनवर लक्ष केंद्रित करून १२ तासांचे नॉन-इंटरलॉकिंग (एनआय) काम केले जाईल. यामध्ये ४ तास वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
या रेल्वे सेवा तात्पुरत्या प्रमाणात प्रभावित
विशाखापट्टम ते मुंबई एलटीटी सुपरफास्ट एक्प्रेस, संत्रागाछी ते चेन्नई सुपरफास्ट एक्स्प्रेस, हजरत निझामुद्दीन ते विशाखापट्टम समता एक्स्प्रेस, भुवनेश्वर ते मुंबई एलटीटी सुपरफास्ट एक्स्प्रेस, पुरुलिया ते हावडा लालमती एक्प्रेस गाड्या कळमना स्थानकावर थांबण्यात येतील. त्यामुळे गाड्या नागपूरला उशिरा पोहोचतील. २१ मे रोजी, २ तासांच्या वाहतूक ब्लॉकमुळे १२६४८ हजरत निझामुद्दीन ते कोईंबतुर कोंगू एक्स्प्रेस आणि १८२३७ कोरबा-अमृतसर एक्सप्रेस या गाड्यांना उशिरा होत आहे.
हा व्यत्यय वगळता मुख्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या प्रवासी गाड्या वेळापत्रकानुसार सुरू राहतील आणि अप आणि डाउन मुख्य मार्गांवर सिग्नलिंग सुरू राहील. त्यामुळे प्रवाशांना कमीत कमी गैरसोय होईल. मध्य रेल्वे प्रवाशांना दीर्घकालीन सुविधांसाठी तात्पुरते असुविधा होत असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.