यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या काही वर्षात नवीन वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांनी महावितरणकडे आगाऊ अग्रीम रक्कम भरली. त्यानंतर शासनाने शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देण्याचे धोरण आणले. त्यामुळे आता शासनाने वीज जोडणीसाठी पैशांचा भरणा केलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी भरलेली रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात असे पाच हजार ५७५ शेतकरी असून त्यांना पाच कोटी रूपयांचा परतावा मिळणार आहे.
अनेक शेतकऱ्यांनी नवीन वीज जोडणीसाठी पैसे भरले. त्यानंतर शासनाने वीज जोडणी धोरणात बदल करून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पूर्णवेळ वीज मिळावी या हेतून सौर ऊर्जा पंप देवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. या धोरणानंतर ज्या शेतकऱ्यांनी नवीन वीज जोडणीसाठी पैसे भरले त्यांचे पैसे सौर पंप योजनेत समाविष्ट करण्यात येणार होते. परंतु, त्यानंतर शासनाने शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी भरलेले पैसे परत करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे जिल्ह्यातील पाच हजार ५७५ शेतकऱ्यांना त्यांनी नवीन वीज जोडणीसाठी दिलेली आगाऊ रक्कम परत मिळणार आहे. साधारणत: पाच कोटींचा परतावा शेतकऱ्यांना केला जाणार आहे. हा परतावा थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात देण्याच्या सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी शनिवारी खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत प्रशासनास दिल्या.
यासोबतच येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा उत्तम दर्जाच्या आणि विहीत दरात उपलब्ध व्हायला पाहिजे. जिल्ह्यात कुठेही बोगस बियाणे, खतांची विक्री, जादा दर, लिंकींग किंवा साठेबाजीसारखे प्रकार टाळण्यासाठी कृषी विभागासोबतच शेतकऱ्यांनीही दक्ष असावे, अशा सूचना पालकंत्र्यांनी केल्या. जिल्ह्यात अनेक ठिकाणी बोगस बियाणे विक्री होते किंवा अधिक दराने बियाणे विकले जातात. लिंकींग करून कृषी निविष्ठा दिली जाते. बरेचदा जास्त मागणी असलेले बियाणे, खतांचा साठा केला जातो. असे प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बोगस, बियाणे, लिंकींग, साठेबाजीबाबत तक्रारी करण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करून हे कक्ष पूर्णवेळ सुरु राहतील, तेथील दूरध्वनी, भ्रमणध्वनी सुरू राहतील याची दक्षता घेण्यासोबतच शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून त्यांच्याशी सौजन्याने संवाद साधणारी टीम नेमण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांची फसवणूह होणार नाही यासाठी कृषी केंद्रांना अचानक भेटी देवून कृषी निविष्ठांचे नमूने घ्या, ते तपासणीसाठी पाठवा, बोगस आढळल्यास न्यायालयात प्रकरणे सादर करून दोषींवर गुन्हा सिद्ध होईल, यादृष्टीने न्यायालयात बाजू मांडा, अशा सूचनाही पालकमंत्री राठोड यांनी बैठकीत केल्या.