नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभा १५ ते १७ मार्च दरम्यान नागपुरातील संघाच्या स्मृती मंदिर परिसरात होणार आहे. राम मंदिर निर्माणानंतर त्यासंदर्भातील पुढील योजना, संघाचे शताब्दी वर्ष, शाखांचा विस्तार अशा महत्त्वाच्या विविध प्रस्तावांवर यात चर्चा होणार आहे. सरसंघचालकांनंतर दुसरे महत्त्वाचे पद असलेल्या सरकार्यवाह पदाची निवडणूक हे या बैठकीचे वैशिष्ट्य राहणार आहे.

संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या संदर्भात माहिती दिली. श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळा ही फार मोठी ऐतिहासिक घटना असून याचे सकारात्मक दुरगामी परिणाम होणार आहेत. त्यादिशेने भविष्यातील योजना ठरवण्यावर प्रतिनिधी बैठकीमध्ये प्रस्ताव ठेवला जाणार असल्याचे आंबेकर यांनी सांगितले.  २०२५च्या विजयादशमीला संघाला शंभर वर्षे पूर्ण होणार असल्याने हे महत्त्वाचे वर्ष  आहे. वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक अत्यंत महत्त्वाची असून स्मृती मंदिर परिसरात १५ ते १७ मार्च तीन दिवस चालणार आहे. प्रत्येक तीन वर्षातून ही सभा नागपुरात होते. बैठकीला संघाच्या ३२ संघटनांचे प्रमुख, भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद, भाजपचे अध्यक्ष, संघटन मंत्री असे देशभरातून १५२९ कार्यकर्त्यांची उपस्थिती अपेक्षित असल्याचे आंबेकर यांनी सांगितले. यात प्रांत आणि क्षेत्रीय स्तरावर संघाच्या विविध संघटनांचे काम करणाऱ्यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

हेही वाचा >>>“तर अंत्यविधीच्या साहित्यावरही भाजपची जाहिरात..” काय म्हणाले रोहित पवार ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 प्रतिनिधीसभेच्या पहिल्या दिवशी १५ मार्चला सकाळी कार्यकारी मंडळाची बैठक होणार आहे. यामध्ये प्रांत संघचालक, कार्यवाह, प्रांत प्रचारकांची उपस्थितीत प्रस्तावावर चर्चा केली जाईल. त्यानंतर क्षेत्र संघचालकांची निवड होऊन  संघाचे प्रतिनिधी सरकार्यवाह यांची निवड करतील. शनिवारी सायंकाळी किंवा रविवारी सकाळी ही निवड करण्यात येणार आहे. विद्यमान सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांची फेरनिवड होणार की, नवीन चेहरा येणार याबाबत संघाकडून कुठलेही संकेत  नाहीत. सहसरकार्यवाहपदी असलेले मनमोहन वैद्य यांना बढती मिळून ते सरकार्यवाह होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.